KIA Recall: किया कंपनीच्या या मॉडेलला कंपनीने केले रिकॉल, त्यामागचे कारणही आहे तितकेच महत्त्वाचे
कमी कालावधीत अनेकांच्या पसंतीस उतरलेली कोरियन कंपनी कियाने आपल्या एका कारच्या मॉडेलला रिकॉल केले आहे. जाणून घेऊया त्यामागचे कारण
मुंबई, भारतात फार कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या कोरियन कंपनी Kia ने सेव्हन सीटर MPV Carence परत मागवले आहे. माहितीनुसार केर्न्सच्या एअरबॅगसंबंधित सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे गाड्या स्वेच्छेने परत बोलावण्यात आले आहे. बऱ्याचदा वाहनांमध्ये काही तांत्रिक अडचण (Manufacturing Defect) असल्यास कंपनी विकलेल्या गाड्या परत मागविते. असे करणारी किया पहिलीच कंपनी नसून याआधी ऑडी, पोर्श, मर्सिडीज ते मारुती, ह्युंदाई, होंडा, महिंद्रा या कंपन्यांचा समावेश आहे. महिंद्राने काही काळापूर्वी थार, XUV 700, XUV 300 परत मागवले होते. त्याआधी मारुतीने डिझायर टूर एस. इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला या अमेरिकन कंपनीनेही तीन मॉडेलच्या एक हजार कार परत मागवल्या होत्या.
कंपनी रिकॉल का करते?
जेव्हा जेव्हा एखाद्या कंपनीला त्याच्या एखाद्या वाहनामध्ये दोषाची माहिती मिळते. त्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी कंपनी कार परत मागवते. यासाठी कंपनी ग्राहकांशी संपर्क साधते. यासोबतच ते त्यांच्या डीलर्सनाही याबाबत माहिती देतात.
जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्या त्रुटी आढळ्यास त्यांची वाहने परत मागवतात. कंपनीने परत बोलावल्यानंतर ग्राहक आपले वाहन जवळच्या सेवा केंद्रात घेऊन जातो. त्यानंतर त्रुटी दूर केली जाते. यासाठी ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा पैसे द्यावे लागणार नाहीत. जेव्हा असे होते, तेव्हा कंपनी विनामूल्य सेवा देते.
सुरक्षेला महत्त्व
वाहनांमधील लहानात लहान त्रुटी मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकते. अशा वेळी वाहनात त्रुटी असल्याचे निदर्शनात आल्यानंतर देखील कंपनीने ती दूर न केल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते. याशिवाय कंपनीचे गुडविल देखील खराब होऊ शकते, म्हणून बऱ्याचदा लहानात लहान त्रुटी आठल्यास कंपनी वाहनांना रिकॉल करते.