
एक नवरदेव मोठ्या अपेक्षांनी लग्नाची तयारी करत होता. दारातून वधू पक्षाच्या घराच्या दिशेने वरात निघणारच होती. सगळी तयारी झालेली. सर्वत्र उत्साह होता. पण तितक्यात फोन वाजला. त्या फोन कॉलमध्ये होणाऱ्या नवरीबद्दल अशी एक गोष्ट समजली की, ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. लग्नाच्या आदल्या रात्री नवरी मुलगी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. नवरदेवाला वधू पळून गेल्याची माहितीच नव्हती. नवरदेव लग्नासाठी खूप उत्साहात होता. डोक्यावर फेटा बांधलेला. शेरवानी परिधान करुन वरात घेऊन निघणारच होता. तितक्या अशी बातमी कळली. हा सगळ्या कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता. उत्तराखंडच्या उधमसिंह नगरमधील हे प्रकरण आहे.
लग्न करणारा वर बाजपूर नगरपालिका क्षेत्रातील एका वॉर्डचा रहिवाशी आहे. त्याचं लग्न उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील एका गावातील युवतीशी ठरलं होतं. रविवारी दोघांच लग्न होणार होतं. त्यासाठी सगळी तयारी झालेली. त्याचवेळी वर पक्षाला एक फोन कॉल आला. समोरुन सांगण्यात आलं की, नवरी मुलगी रात्रीच आपल्या प्रियकरासोबत पळून गेलीय.
हे कौटुंबिक प्रकरण आहे
हे वास्तव कळताच मुलाच्या बाजूला एकच गोंधळ सुरु झाला. संतप्त नातेवाईकांनी कोतवाली येथे पोहोचून वधू पक्षाविरोधात तक्रार नोंदवली. लग्नाच्या तयारीसाठी मोठा खर्च झालाय. आता कुटुंबाला सामाजिक अपमानाचा सामना करावा लागतोय असा आरोप वर पक्षाने केला. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. एसएसआय जसविंदर सिंह यांनी सांगितलं की, हे कौटुंबिक प्रकरण आहे. मानवी दृष्टीकोनातून दोन्ही बाजूंना परस्पर सहमतीने तोडगा काढण्यास सांगण्यात आलं. सध्या पळून गेलेली युवती आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे.