कोल्हापूरच्या विद्यार्थिनीला पाण्यातून विषबाधा, शिक्षक अटकेत
सानिका माळीला कीटकनाशकाची बाटली आणून दिल्याप्रकरणी शिक्षक निलेश प्रधाने यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा होऊन दहावीच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षकानेच सानिका माळीला कीटकनाशकाची बाटली आणून दिल्याचं तपासात समोर आलं. (Kolhapur Teacher arrest in Student Death)
पिण्याच्या पाण्यातून विषबाधा होऊन दहावीत शिकणाऱ्या सानिका माळी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. शिरोळ तालुक्यातील शिरटीमधील शाळेत पाच दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला होता. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी सानिकाचा मृत्यू झाला.
सानिकाला कीटकनाशकाची बाटली आणून दिल्याप्रकरणी शिक्षक निलेश प्रधाने यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रयोगासाठी सानिकाने कीटकनाशक मागितल्याची माहिती प्रधाने यांनी पोलिस तपासात दिली.
सानिकाच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत कोणीतरी विषारी औषध टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागण्यासाठी संतप्त नातेवाईकांनी विद्यार्थिनींना मृतदेह हायस्कूलच्या दारात ठेवला होता.
नेमकं काय घडलं?
सानिका माळी शिकत असलेल्या शाळेत गेल्या आठवड्यात दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा होती. प्रात्यक्षिकानंतर वर्गात आलेल्या सानिकाने आपल्या दप्तरातील बाटलीतून पाणी प्यायलं. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घरी गेली.
सानिकाची प्रकृती खालावल्यामुळे तिला शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. परंतु पाच दिवसांनी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. (Kolhapur Teacher arrest in Student Death)