सून-सासऱ्याच्या प्रेम कहाणीचा करुण अंत, प्रेमासाठी चार महिन्यांपूर्वी घराबाहेर पडले, पण अचानक…
छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बिलासपूर जिल्ह्यातील चकरभाटा पोलीस ठाणे हद्दीत कनेरीमध्ये सून आणि सासऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रायपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बिलासपूर जिल्ह्यातील चकरभाटा पोलीस ठाणे हद्दीत कनेरीमध्ये सून आणि सासऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एकत्र झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांचे झाडावर लटकलेले मृतदेह बघून परिसरातील नागरिकांचा काळजाचा ठोकाच चुकला. दोघांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात मृतक महिला आणि परुष यांच्यात सून आणि सासऱ्याच नातं असल्याचं समोर आलं आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस या निष्कर्षापर्यंत आले आहेत. तसेच मृतक सून आणि सासऱ्यामध्ये प्रेमसंबंध होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. मृतांच्या कुटुंबियांनी स्वत: त्यांच्यातील प्रेम प्रकरणाच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
मृतकाचा पुतण्या मानसिक आजाराने त्रस्त
मृतक 50 वर्षीय पुरुषाचं नाव खेलूराम केवट असं होतं. तर मृतक 35 वर्षीय महिलेचं गीता असं नाव होतं. खेलूराम हे केवट गावात शेतीचे काम करायचे. त्यांचा पुतण्याचं कुटुंब देखील याच गावात राहत होतं. गीता ही खोलूरामच्या पुतण्याची पत्नी होती. खेलूराम हा परोपकारी वृत्तीचा होता. तो मदतीला धावून जायचा. खेलूरामचा पुतण्या हा मानसिक आजाराने त्रस्त होता. तसेच त्याला मिर्गीचे झटके यायचे. त्यामुळे खेलूराम हा त्याच्या मदतीसाठी जायचा.
मृतकाचं पुतण्याच्या पत्नीशी संबंध
याचदरम्यान खेलूराम आणि गीता एकमेकांच्या संपर्कात जास्त आले आणि प्रेमात पडले. त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मिळाली होती. याशिवाय गावातही याबाबतची माहिती पसरली होती. त्यामुळे दोघेजण चार महिन्यांपू्र्वी गाव सोडून बेपत्ता झाले होते. त्यांनी गाव सोडण्यापूर्वी कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण होते. मार्च महिन्यानंतर ते एकदाही गावात दिसले नव्हते. पण 27 ऑगस्टला अचानक दोघांचे मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्यामुळे गावकऱ्यांनाही धक्का बसला.
पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल
या प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मृतकांविषयी विचारलं. तेव्हा काही स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्याच माहितीच्या आधारावर पोलीस मृतकांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्यांचादेखील जबाब नोंदवला. मात्र तरीदेखील या हत्येचा उलगडा झालेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते तपास करत आहेत.
हेही वाचा :
आधी पप्पांना गाडीने उडवलं सांगितलं, नंतर वडिलांच्या हत्येची कबुली, तरुणाने असं का केलं?