लग्न घटिका समीप, नवरदेवाचं एक सिक्रेट मैत्रिणींसमोर उघडं पडलं, वधूचा लग्नाला नकार
हार घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना वधू स्टेजवर पोहोचली, तेव्हा अचानक वधूच्या मैत्रिणी आणि काही महिलांनी वराला पाहिले आणि त्यांना शंका आली. लगेचच कुजबूज सुरु झाली
लखनौ : लग्न घटिका समीप आली, मुंडावळ्या बांधून नवरदेव आणि नवरी बोहल्यावर उभे राहिले, मात्र इतक्यात नवरदेवाचं (Groom) एक गुपित ‘उघडं’ पडलं आणि वरातीला नववधूच्या (Bride) शिवाय परत जाण्याची वेळ आली. नवरदेवाला टक्कल असून त्याने विग (Hair Wig) घातला आहे, हे त्याचं सिक्रेट नववधूला ऐन लग्नाच्या मुहूर्तावर समजलं. त्यानंतर वधूची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला, मात्र ती काहीएक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी वरातीला वधूविनाच परतावे लागले. उत्तर प्रदेशातील इटावामध्ये हा प्रकार घडला. वधूपक्ष औरैया जिल्ह्यातील बिधुना येथून आला होता. शेवटी वधू आणि वरपक्षाने परस्पर संमतीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील भरथना पोलीस स्टेशन हद्दीतील ध्यानपुरा गावातील तरुणीचे लग्न औरैया जिल्ह्यातील बिधुना येथील तरुणासोबत निश्चित झाले होते. लग्नाचे काही विधी 16 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न झाले. वधू पक्षाने मोठ्या थाटामाटात हे विधी पूर्ण केले. त्यानंतर, 22 फेब्रुवारी 2022 रोजी बिधुना येथून वरात ऊसराहार भागातील एका खाजगी अतिथीगृहात आली. नवरदेव मोठ्या थाटामाटात घोड्यावर स्वार होऊन द्वारचर विधीसाठी पोहोचला.
वधूच्या मैत्रिणींना शंका
यावेळी वधू पक्षाने बँड बाजाच्या गजरात वरातीचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर हार घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना वधू स्टेजवर पोहोचली, तेव्हा अचानक वधूच्या मैत्रिणी आणि काही महिलांनी वराला पाहिले आणि त्यांना शंका आली. लगेचच कुजबूज सुरु झाली, तेव्हा कळलं की वराच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याशिवाय वराला टक्कल आहे, त्याच्या डोक्यावर केस नाहीत, तर त्याने विग घातला आहे.
यानंतर ही बातमी वधूपर्यंत पोहोचली. सत्य समजल्यानंतर वधूने लग्न करण्यास लगेचच नकार दिला. लग्न मोडल्यामुळे वधू पक्ष आणि वर पक्षात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वधू लगेचच वडिलांसोबत घरी परतली. वाद इतका वाढला की, वरपक्ष पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले.
वधूविनाच वरात परतली
पोलिसांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन्ही पक्षांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता माघार घेण्याचं ठरवलं. यानंतर वरात वधूशिवाय परतली. वर आणि वधूच्या बाजूचे काही लोक आले होते. आपसात वाद झाला, पण कारवाई झाली नाही. आपापसात सामंजस्याने प्रकरण मिटवून ते परत गेले आहेत, असं एसएचओ गंगा दास गौतम यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
गिफ्ट बॉक्स उघडताच नववधू आधी विचारात पडली अन् मग हसली, काय खास असेल? पाहा Video
Viral Video : स्वत:च्याच लग्नात वधूच्या डुलक्या, बँक्वेट हॉलमध्ये पिकला हशा
स्वतःच्याच लग्नात पैसे लुटायला लागले वधू-वर; यूझर्स म्हणतायत, सर्व 36 गुण जुळले बहुतेक!