बँक लूट, दरोड्यात महाराष्ट्राचा चौथा नंबर, बँका भयभीत, मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात बँकेत दरोडा टाकून बँक लुटण्याच्या अथवा ग्राहकांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात बँकेत दरोडा टाकून बँक लुटण्याच्या अथवा ग्राहकांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत. या वाढत्या घटनांमुळे बँक कर्मचारी, अधिकारी आणि ग्राहक देखील सुरक्षित नसल्याचा प्रत्यय आता वारंवार येऊ लागला आहे. त्यामुळे आता बँकर्सच्या संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी साकडं घातलं आहे
महाराष्ट्रातील बँक लुटीच्या घटना
- १४ जून २०१९ (नाशिक ) – चोरट्यांनी मुथूट फायनान्सच्या शाखेत केलेल्या दरोड्याचा प्रयत्नात १ कर्मचाऱ्याची हत्या तर तीन गंभीर जखमी
- ४ जून २०१९ ( नागपूर,कटोल) – एसबीआयचे एटीएम फोडून चोरट्यांनी १६ लाख रुपयांची रोकड पळवली
- १७ मार्च २०१९ ( पुणे, भोसरी ) -बँक ऑफ बडोदा एटीएम फोडून ३५ लाख रुपयांची रोकड पळविली
- ११ मार्च २०१९ ( सातारा,कराड ) -बँक ऑफ महाराष्ट्र २२ लाख रुपये आणि सोनं लुटलं
- २२ फेब्रुवारी २०१९ ( पुणे, मार्केट यार्ड ) – स्टेट बँक ऑफ इंडिया २८ लाख रुपयांचा दरोडा
- ८ फेब्रुवारी २०१९ ( कोल्हापूर,पन्हाळा ) – यशवंतपूर को. ऑप.बँक १.२५ करोड रुपयांची लूट
- १२ ऑक्टोबर २०१८ ( नाशिक ,शिवाजीनगर ) एसबीआय बँक १६ लाखांची लूट
महाराष्ट्रातील ही आकडेवारी सिद्ध करते की राज्यातील फायनान्स कंपन्या, खासगी आणि सहकारी बँका या सुरक्षित नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने यावर कायमस्वरुपी उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी बँकर्स संघटनांकडून केली जात आहे.
बँकांना लुटण्याच्या घटना वाढतच असल्याने राज्यातील बँकांना आपल्या ग्राहकांची आणि स्वतःच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता कशी करावी हा प्रश्न सतावत आहे. त्यात जुन्या सुरक्षा नियमांना बदलण्याची मागणीदेखील जोर धरु लागली आहे .
आरबीआयच्या माहितीनुसार बँक लुटण्याच्या घटनेत, दरोड्याचा घटनेत, महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. तर एकूण लुटलेल्या रक्कमेच्या आकडेवारीमध्ये राज्याचा पहिला नंबर लागतोय. ही आकडेवारी निश्चितच गंभीर असून यामुळे बँक आणि ग्राहकांची सुरक्षितता होणार कशी हा प्रश्न अनुत्तरित आहे.