“तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही तुमचं काम 70 च्या दशकात केलं, आता आम्ही पाहतो”
देशभरात मागील काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात (CAA) जोरदार आंदोलनं होत आहेत. अगदी सामान्य नागरिकांपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई : देशभरात मागील काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात (CAA) जोरदार आंदोलनं होत आहेत. अगदी सामान्य नागरिकांपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अनुराग कश्यप आघाडीवर आहेत. त्यांनी वेळोवेळी या कायद्याविरोधात आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना थेट टोला लगावला आहे (Anurag Kashyap target Amitabh Bachchan).
बॉलीवुडमध्ये शबाना आझमी, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, स्वरा भास्कर, राहुल बोस, सईद मिर्जा, सुहासिनी मुळे, जावेद जाफरी, सुशांत सिंग यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी सीएएला विरोध केला आहे. मात्र, अनेक दिग्गजांनी यावर बोलणे टाळले आहे. यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. बच्चन यांच्या या मौनालाच दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी लक्ष्य केलं. अमिताभ बच्चन यांनी नव्या वर्षांच्या निमित्ताने एक विनोदी ट्विट करत फार फरक नसल्याचं म्हटलं.
T 3592 – नया साल आने में बस कुछ ही दिन बाक़ी हैं ; ज़्यादा परेशान होने की बात नहीं है , बस …. 19-20 ( उन्नीस बीस ) का ही फ़र्क़ है ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 27, 2019
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “नवं वर्ष येण्यासाठी आता थोडेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे फार काळजी करण्याचं कारण नाही. फक्त ‘उन्नीस-बीस’चा फरक आहे.”
यावर अनुराग कश्यप यांनी अमिताभ बच्चन यांना चांगलाच उपरोधात्मक टोला लगावला. अनुराग कश्यप म्हणाले, “मागील वर्षात आणि पुढील वर्षात केवळ एकोणावीस-वीसचाच फरक नाही, तर खूप मोठा फरक आहे. सध्यातरी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या वाट्याचं काम तुम्ही 70 च्या दशकातच केलं आहे. तेव्हापासून आम्ही आमच्या आतील बच्चन घेऊन फिरत आहोत. यावेळी समोर गब्बर असो की शेर किंवा शाकाल… आम्ही पण पाहतोच.”
इस बार फ़र्क़ उन्नीस बीस का नहीं है सर, इस बार फ़र्क़ बहुत बड़ा है । फ़िलहाल आप कृपया अपनी सेहत का ख़याल रखें ।अपने हिस्से का आपने ७० के दशक में ही कर दिया था , तबसे अपने अंदर का बच्चन हम अपने अंदर ले के घूम रहें हैं । इस बार सामने गब्बर हो या LION या फिर शाकाल ….हम भी देखेंगे https://t.co/Iv0h3hPrJI
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) December 27, 2019
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांनी देखील अमिताभ बच्चन यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, “जेव्हा सुंयक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) सरकार होतं, तेव्हा बिग बी अमिताभ बच्चन सरकारवर भरपूर टीका करत होते. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यापासून त्यांनी मौन धारण केलं आहे.” सिंघवी यांच्या या प्रतिक्रियेनंतरही अमिताभ बच्चन यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.