Valentine Week : बापासाठी तिने प्रियकराला सोडलं, एका ऊसतोड कामगाराच्या मुलीची हृदयाला भिडणारी प्रेमकहाणी, पाहा गाणं

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 5:14 PM

एक ऊसतोड मजूर त्याच्या मुलीला विनंती करतो. परिस्थिती बेताची असल्यामुळे लग्न करण्याचा हट्ट ऊसतोड मजूर आपल्या मुलीला करतो. आपल्या बापाचं हताशपण पाहून मुलगी आपल्या प्रेमाचं बलिदान देते.

Valentine Week : बापासाठी तिने प्रियकराला सोडलं, एका ऊसतोड कामगाराच्या मुलीची हृदयाला भिडणारी प्रेमकहाणी, पाहा गाणं

जळगाव (खान्देश) : जगभरात आजपासून व्हॅलेन्टाईन आठवडा (Valentine Week) सुरु झालाय. तरुणांमध्ये या आठवड्याचा एक वेगळाच जोश असतो. प्रेम ही भावनाच तशी आहे. पण प्रेमामध्ये जाणीव असते. प्रेमामध्ये जबाबदारी आणि समर्पण असतं. प्रेमातलं समर्पण सांगणारं खान्देशातील एक गाणं प्रसिद्ध आहे. आजच्या व्हॅलेन्टाईन डेच्या पहिल्या दिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला त्या गाण्याविषयी माहिती देणार आहोत. या गाण्यातील नायक हा ऊसतोड मजूर आहे. त्याची प्रेयसी ही ऊसतोड मजुराची मुलगी आहे. ऊसतोड मजुराच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष असतो. अशा परिस्थितीत फुललेलं प्रेमकथेचं काय होतं ते या गाण्याच अतिशय भावस्पर्शीपणाने मांडण्यात आलंय.

या गाण्यातील एक ऊसतोड मजूर त्याच्या मुलीला विनंती करतो. परिस्थिती बेताची असल्यामुळे लग्न करण्याचा हट्ट ऊसतोड मजूर आपल्या मुलीला करतो. आपल्या बापाचं हताशपण पाहून मुलगी आपल्या प्रेमाचं बलिदान देते.

बघ बेटा हे लग्न तुला करावंच लागेल. आपण ऊस तोडून, मजुरी करुन कसंतरी पोट भरतो. यामध्ये तुझ्या लग्नाची चिंता. बघ हे स्थळ चांगलं आहे. ते तुझ्या लग्नाचा सर्व खर्च करायला तयार आहेत. पोरी, माझ्या शब्दाचा मान ठेवून हे लग्न करुन घे, असं वडील मुलीला सांगतात.

वडिलांचे हे बोल मुलीच्या काळजाला भिडतात. ती आपल्या प्रियकरासोबत न लग्न करता वडील सांगतात त्या मुलाशी लग्न करते. त्यामुळे या मुलीच्या प्रियकरांची झालेली मनाची घालमेल अतिशय भावनिक पद्धतीने या अहिराणी गाण्यात मांडण्यात आलीय.

‘मेहंदी ना हाथ’ असं या गाण्याचं शिर्षक आहे. मुलीचं आपल्यावर इतकं प्रेम असून ती आज परिस्थितीमुळे दुसऱ्याच्या हाताची मेहंदी लावतेय. हे पाहून तिचा प्रियकर आतून खचलाय. तो या गाण्यातून आपल्या प्रेयसीसोबत संवाद साधतोय.

गाण्यात मुलगा प्रेयसीला काय म्हणतो?

तुने माझी साथ सोडली. तू माझ्या मनाचा घात केला. माझी साथ सोडून तू मला बरबाद करुन गेलीस. दुसऱ्याच्या नावाची मेहंदी लावून तू मेहंदीचा हाथ रंगवला.

मी सर्व दुनियेला विसरुन तुझ्यावर विश्वास ठेवला. पण तू अर्ध्यात सोडून गेलीस. मला विसरुन गेलीस

मुलीचं भावनिक उत्तर

प्रियकराच्या या भावस्पर्शी शब्दांवर त्याची प्रेयसीदेखील गाण्यात आपलं म्हणणं मांडते. जेव्हा तुझा फोटो बघते तेव्हा मलाही रडू कोसळतं. मला हृदयाच्या मंदिरात आजही तुझाच चेहरा आहे. तुझी सातत्याने आठवण येते. मी दिवस-रात्र रडते.

मुलाचं प्रेमातलं समर्पण

शेवटी तोदेखील तिला सांगतो. तू माझं आयुष्य होतंस. तुझ्यावर मी प्रेम केलंय. त्यामुळे तुझ्यासाठी मी हे गाव सोडून देईन. पण तुझं नाव बदनाम करणार नाही. कारण तू माझं प्रेम होतीस, असं मुलगा मुलीला म्हणतो.

संबंधित अहिराणी गाणं हे खान्देशातील प्रसिद्ध युवा गायक भैय्या मोरे यांनी तयार केलंय. या गाण्यातील मुख्य नायकाची भूमिका साकारणारा कलाकार देखील भैय्या मोरे हेच आहेत. याशिवाय हे गाणं त्यांनी स्वत: गायलं आणि तयार केलंय. भैय्या मोरे यांचे अनेक अहिराणी गाणी खान्देशासह जगभरात प्रसिद्ध झाली आहेत.

गुलाबाचं फुल देऊन मनातलं सांगूनच टाका

आपण कुणावरही ठरवून प्रेम करत नाही. प्रेम हे प्रेम असतं. ते ठरवून होत नाही. ते फक्त होऊन जातं. ते कधी पाहिल्यावर होऊ शकतं, कधी एखाद्याचं काम, स्वभाव पाहिल्यावर होऊ शकतं. किंवा सहवासातूनदेखील होऊ शकतं.

प्रेम ही फार निखळ भावना आहे. त्यामुळे प्रेमात सारं काही माफ असतं. असं मानलं जातं. प्रेमामध्ये सौंदर्य असतं. मग ते एकतर्फी असलं तरीसुद्धा. पण एकतर्फी असणाऱ्या प्रेमात यातना खूप असतात.

अर्थात आपण आपल्या त्या यातना दूर करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्या व्यक्तीच्या समोर मनाच्या भावना व्यक्त करु शकतो. त्यासाठी आपण गुलाबाचं फूलही देऊ शकतो. समोरच्या व्यक्तीने आपल्या भावनांचा आदर केला. आपला विचार करत होकार दिला तर चांगलंच आहे. अन्यथा आयुष्यात पुढे चालत राहायचं. कुणीतरी आपल्याला भेटेलच की!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI