दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण, मजूर बापाकडे अपहरणकर्त्यांची दोन कोटींच्या खंडणीची मागणी
दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या (Accused Kidnapped two sisters) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक : दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या (Accused Kidnapped two sisters) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. येवला तालुका पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे अपहरण करण्यात आलेल्या मुलींचे वडील हे मोलमजुरीचं काम करतात. तरीही अपहरणकर्त्यांकडून (Accused Kidnapped two sisters) दोन कोटींची खंडणी मागितली गेल्यामुळे पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पोलिसांनी या दोघी बहिणींची सुटका केली आहे.
दोघांपैकी मोठी बहिण ही 17 वर्षांची तर लहान 15 वर्षांची आहे. ते येवला तालुक्यातील गुजरखेडे येथे वास्तव्यास आहेत. संशयित आरोपी राहुल विजय पवार (वय 20) याने रविवारी रात्री म्हणजे 8 मार्चला रात्री काहीतरी आमिष दाखवून दोघी बहिणींचं अपहरण केलं. या कामात त्याला तृतीयपंथी असलेला दुसरा संशयित आरोपी पूजा उर्फ दिनेश राजेंद्र सोळसे याने मदत केली. राहुल पवार हा मनमाड तालुक्यातील नवसारी भागात राहतो. तर दिनेश सोळसे कोपरगाव तालुक्यातील पोहोगावचा रहिवासी आहे.
हेही वाचा – मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, आव्हाडांची गणेश नाईकांवर बोचरी टीका
राहुल पवार मुलींना दिनेश सोळसेच्या कोपरगाव येथे घेऊन गेला. त्याने अपहरण केलेल्या मुलींच्या वडिलांना फोन करत तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. दोन कोटी न दिल्यास मुलींना जीवे मारु, अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलींच्या वडिलांनी तातडीने येवला तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी ‘अशी’ केली कारवाई
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि मनमाड उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली. त्यांनी येवला तालुका पोलीस ठाणे आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे असे दोन पथक तयार केले. त्यांना या प्रकरणी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला. दोन्ही पथकांना कोपरगाव तसेच शिर्डी परिसरात पाठवण्यात आले. अखेर मध्यरात्री दोघी आरोपींना पोलिसांनी अटक करत मुलींची सुटका केली.