मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रेंचे नाव द्या, संभाजीराजेंची गडकरी-उद्धव ठाकरेंकडे मागणी
स्वराज्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे नाव मुंबई-गोवा महामार्गाला देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे (BJP MP Chhatrapati Sambhaji) यांनी केली आहे.
मुंबई : स्वराज्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे नाव मुंबई-गोवा महामार्गाला देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे (BJP MP Chhatrapati Sambhaji) यांनी केली आहे. संभाजीराजे यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे. याबाबत संभाजीराजे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे (BJP MP Chhatrapati Sambhaji).
महान शिवभक्त आणि स्वराज्याचे आरमार प्रमुख “सरखेल कान्होजी आंग्रेंचे” नाव मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला देण्यात यावे. अशी मागणी मी केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी जी @nitin_gadkari आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @OfficeofUT यांना पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/8PsfeAdUQ9
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 15, 2020
खासदार संभाजीराजे यांचं पत्र
“स्वराजाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही. कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला. कान्होजी आंग्रेंनी औरंगजेबाच्या स्वारीच्या काळातच नव्हे तर पुढे 1729 पर्यंत मराठा सम्राज्याची अहर्निश सेवा करुन इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या शत्रूंवर प्रचंड दहशत निर्माण केली. याचे शेकडो पुरावे इंग्रजांच्या आणि पोर्तुगीजांच्या दफ्तरात मिळतात. ते पाहिल्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्याएवढा पराक्रमी आरमारी सेनानी अखिल हिंदुस्तानच्या इतिहासात झाला नाही. कोकणच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या तसेच हिंदुस्थानच्या आरमारी इतिहासाची पूर्तता कान्होजी आंग्रेशिवाय होऊ शकत नाही.
दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉकमधील नौदल प्रमुखांच्या कार्यालयाच्या अगदी दारात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे स्मारक आहे. कदाचित आजच्या नौदल प्रमुखांनी आपल्या आद्य नौदल प्रमुखाला सॅल्यूट करुनच कार्यालयात प्रवेश करावा, अशी संकल्पना असेल. अशा स्वराज्यनिष्ठ महान विराची दखल परिवहन मंत्री म्हणून घ्याल आणि मुंबई-गोवा महामार्गाला सरखेल कान्होजी आग्रे यांचे नाव द्याल, असा विश्वास आहे”, असं संभाजीराजे पत्रात म्हणाले आहेत. अशाच प्रकारचं एक पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठवलं आहे.
हेही वाचा : शिवभक्तांचे 23 कोटी रुपये दलालीसाठी द्यायचे का? : संभाजीराजे छत्रपती