दिल्लीत विधानसभा निवडणुकांची धामधूम, मोदी, केजरीवालांची प्रतिष्ठा पणाला
भाजप-काँग्रेसनं उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी विलंब केला. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. केजरीवालांसह तब्बल 200 हून अधिक उमेदवारांनी आजच अर्ज भरले.
नवी दिल्ली : कडाक्याची थंडी आणि धुक्यानं दिल्लीच्या अंगावर शहारा आणला आहे. मात्र, खरा थरार 11 फेब्रुवारीला अनुभवायला मिळणार आहे (Delhi Assembly Elections). कारण, दिल्ली राखण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रतिष्ठा पुन्हा एका पणाला लागली आहे. त्यामुळे थंडीनं आता अंग शहारत असलं तरी 11 तारखेला दिल्लीचं दिल कुणासाठी धडकणार? याची उत्सुकता सर्वांना आहे (Delhi Assembly Elections).
येत्या 8 जानेवारीला दिल्ली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भाजप-काँग्रेसनं उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी विलंब केला. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. केजरीवालांसह तब्बल 200 हून अधिक उमेदवारांनी आजच अर्ज भरले. दरम्यान, केजरीवालांना विलंब व्हावा म्हणून पुरेसे कागदपत्रं नसलेल्या 35 जणांना रांगेत उभं करण्यात आलं होतं, असा दावा आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केला.
आम आदमी पक्ष अर्थात केजरीवाल सरकारनं मोफत दवाखाना, चांगल्या शाळा, वीज, बससेवा, महिलांना मोफत मेट्रो असे अनेक महत्वाची काम केली आहेत. दिल्लीत सरकारी शाळांचं बदललेलं रुप देशात एक नवं मॉडेल म्हणून उदयास येतं आहे. या सर्व निर्णयांनंतर दिल्लीकर कुणाला कौल देतात, हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाचं म्हणजे केजरीवालांसमोर भाजप आणि काँग्रेस नेमकं कोणाला उभं करते, हा मोठा प्रश्न होता. मात्र, भाजप आणि काँग्रेसने असे उमेदवार उभे केले ज्यांना दिल्लीकर व्यवस्थितपणे ओळखत देखील नाहीत. नवी दिल्लीच्या जागेवरुन केजरीवालांविरोधात भाजपने सुनील यादव यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसकडून रमेश सबरवाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
येत्या 8 तारखेला मतदान आणि 11 तारखेला दिल्लीचा निकाल आहे. मात्र, ज्या प्रकारे आपविरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे, ते पाहता भाजप आणि काँग्रेसने आधीच पराभव स्वीकारल्याचा दावा आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. सीएए, एनआरसी सारखे विषय, अशांत झालेले विद्यापीठ कॅम्पस आणि झारंखडमधला पराभव यामुळे भाजपपुढे मोठं आव्हान असणार आहे.
Delhi Assembly Elections