निवडणुकांना शिस्त लावणारे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन
भारतात निवडणूक प्रक्रियेंमधील महत्त्वाच्या सुधारणांसाठी ओळखले जाणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं (T N Seshan died) रविवारी (10 नोव्हेंबर) निधन झालं.
चेन्नई : भारतात निवडणूक प्रक्रियेंमधील महत्त्वाच्या सुधारणांसाठी ओळखले जाणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं (T N Seshan died) रविवारी (10 नोव्हेंबर) निधन झालं. त्यांचं वय 86 वर्षे होतं. शेषन (T N Seshan died) त्यांच्या शिस्तबद्ध कामासाठी ओळखले जात होते. त्यांच्या याच स्वभावाने अनेक राजकारण्यांना कायद्याची जरब बसवली.
शेषन यांनी निवडणुकीसंबंधित कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली. यात त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यापासून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांवरही कारवाईचा बडगा उगारला. बिहारमध्ये 4 टप्प्यांमध्ये निवडणूक घेणारे ते पहिले निवडणूक आयुक्त होते.
विशेष म्हणजे शेषन यांच्या कारवाईनंतर लालू प्रसाद यादव यांनी प्रचार रॅलीमध्ये अनेकदा त्यांच्याविरोधात वक्तव्ये केली. मात्र, शेषन यांनी आपलं शिस्तबद्ध काम सुरुच ठेवलं. कायदा सुव्यवस्था राहावी आणि नागरिकांना कोणत्याही दडपणाशिवाय मतदान करता यावं म्हणून त्यांनी अनेकदा निवडणुका रद्द केल्या. बिहारमध्ये त्यांनी बूथ कॅप्चरिंग रोखण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाचा देखील उपयोग केला. बिहारच्या इतिहासातील ती निवडणूक सर्वात मोठी निवडणूक मानली गेली.
शेषन हे देशाचे 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी निवडणूक आयुक्त होण्याआधी अनेक मंत्रालयांमध्ये काम केले. त्यांनी ज्या मंत्रालयात काम केलं तेथील कामात मोठ्या सुधारणा केल्या. 1990 मध्ये शेषन यांचा ‘आय इट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट’ हा डायलॉग चांगलाच गाजला.
शेषन आपल्या 6 भाऊ-बहिणींमध्ये सर्वात छोटे होते. त्यांचे वडील वकील होते. त्यांचा जन्म केरळमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांनी आयएएस परिक्षेत देखील अव्वल स्थान मिळवले होते. पुढे त्यांनी कॅबिनेट सचिव पदापर्यंत काम पाहिले.