घुसखोरी करणाऱ्या चीनला उत्तर देण्याची वेळ आली आहे : नौदल प्रमुख
भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह (Indian Navy Chief Admiral Karambir Singh Nijjer) यांनी चिनी नौदलाला उत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह (Indian Navy Chief Admiral Karambir Singh Nijjer) यांनी चिनी नौदलाला उत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. हिंदी महासागरात चीनच्या नौदलाची घुसखोरी वाढत असल्याने, त्यांना हुसकावण्यासाठी उत्तर द्यावं लागेल, असं अॅडमिरल करमबीर सिंह (Admiral Karambir Singh) म्हणाले. चीनने आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या अन्य माध्यमातून नौदलात अनेक संसाधने पाठवली आहेत, त्यामुळे भारताने सतर्क राहणं आवश्यक असल्याचंही करमबीर सिंह म्हणाले.
चीनने नुकंतच बुधवारी सैनिकांचा विकास आणि खर्चाची माहिती देणारी श्वेतपत्रिक काढली होती. त्यानुसार चीनच्या नौदलावर 2012 ते 2017 दरम्यान जवळपास 10 टक्के खर्च वाढवल्याची माहिती समोर आली.
चीनच्या श्वेतपत्रिकेवरुनच अॅडमिरल करमबीर सिंह यांनी सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “चीनवर अत्यंत चलाखीने नजर ठेवणं आवश्यक आहे. जगात महाशक्ती बनण्याच्या इच्छेने त्यांनी नौदल सक्षम केलं आहे. त्यामुळे आपल्याही बजेटमध्ये तशी पावलं उचलणे गरजेचं आहे”
सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात 140 युद्धनौका आणि 220 लढाऊ विमाने आहेत. मात्र यातील अनेक आता निवृत्तीला आले आहेत.