नेव्हीचा निधी 18 टक्क्यांहून 13 टक्के केला, नौदल प्रमुखांची जाहीर नाराजी
भारतीय नौदलाचे प्रमुख करमवीर सिंह (Karambir Singh) यांनी नौदलाच्या निधीतील कपातीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नौदलासाठीची सुरक्षा अर्थसंकल्पातील तरतूद 18 टक्क्यांवरुन 13 टक्क्यांवर आल्याचंही नौदल प्रमुखांनी नमूद केलं.
पुणे: भारतीय नौदलाचे प्रमुख करमवीर सिंह (Karambir Singh) यांनी नौदलाच्या निधीतील कपातीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नौदलासाठीची सुरक्षा अर्थसंकल्पातील तरतूद 18 टक्क्यांवरुन 13 टक्क्यांवर आल्याचंही नौदल प्रमुखांनी नमूद केलं.
नौदल प्रमुख करमवीर सिंह म्हणाले, “आमच्यासमोर दिर्घकालीन आर्थिक तरतुद असण्याबाबत आव्हान आहे. आम्हाला एक युद्धजहाज बनवायचे ठरले, तर त्यासाठी किमान 10 वर्षे लागतात. यासाठी आम्हाला आर्थिक तरतुदीची गरज आहे. विशेषतः नौदलासाठी याची विशेष गरज आहे. 2012-13 मध्ये संरक्षण विभागाच्या आर्थिक तरतुदीत नौदलाचा वाटा वाटा 18 टक्के होता, आज तो 13 टक्क्यांवर आला आहे.”
नौदल प्रमुख सिंह भारतीय महासमुद्र (हिंदी महासागर) आणि त्या अनुषंगाने भारताची प्राथमिकता यावर एका व्याख्यानात बोलत होते. हिंदी महासागरातील इतर देशांना मदत करण्यासाठी आणि इतर देशांचा या देशांवरील प्रभाव कमी करण्यासाठी डिफेंस डिप्लोमसी फंडची (Defence Diplomacy Fund) आवश्यकता असल्याचे म्हटले.
नौदल प्रमुख म्हणाले, “आम्ही अनेक देशांमध्ये जातो. तेथे त्यांना काही मदतीचे आश्वासन देतो. मात्र, तेथून परत आल्यावर आम्हाला ती मदत पाठवण्यासाठीच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे दिलेली आश्वासनं पाळण्यात आपली कामगिरी खराब आहे. ज्यावेळी सैन्य प्रमुख एखाद्या ठिकाणी जाऊन मदतीचे आश्वासन देतात तेव्हा त्यांना परत येऊन ते साहित्य पाठवण्यासाठी दोन वर्ष झगडायची वेळ पडायला नको. ती मदत तात्काळ संबंधित देशांना पाठवता यायला हवी. त्यामुळे इतर देशांचा हिंद महासागरावरील प्रभाव लवकरात लवकर कमी होईल.”