मला भारताकडे सोपवलं तर मी जीव देईन, नीरव मोदीची युके न्यायालयाला धमकी
पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिरा व्यापारी नीरव मोदी याची जामीन याचिका पुन्हा एकदा युकेच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने फेटाळली आहे.
लंडन : पंजाब नॅशनल बँक फसवणूक (PNB scam) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिरा व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याची जामीन याचिका पुन्हा एकदा युकेच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने फेटाळली आहे (Westminster Magistrates Court). यावर ‘जर माझं भारताकडे प्रत्यार्पण केलं तर मी जीव देईल’, अशी धमकी नीरव मोदीने दिली. तसेच, त्याला तुरुंगात दोनवेळा मारहाण झाल्याचंही सुनावणी दरम्यान त्याने सांगितल. मात्र, तरीही न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळून लावली (Nirav Modi).
‘वेंड्सवर्थ तुरुंगात दोनवेळा मारहाण’
नीरव मोदी याची गुरुवारी वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी होती. यावेळी त्याचा वकील कीथ क्यूसी हे देखील त्यांच्यासोबत होते. वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट न्यायालयात नीरव मोदीने आतापर्यंत पाचवेळा जामीन याचिका दाखल केली आणि पाचही वेळा न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली.
सध्या नीरव मोदी हा वेंड्सवर्थ तुरुंगात आहे. या तुरुंगात त्याला दोनदा मारहाण झाल्याचं नीरव मोदीने न्यायालयात सांगितलं. पहिल्यांदा एप्रिलमध्ये त्यानंतर बुधवारी त्याला मारहाण करण्यात आल्याचं त्याने सागितलं. ‘बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास दोन कैदी नीरवच्या कोठडीत घुसले आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी नीरवला मारहाण केली, खाली पाडलं, पैशांसाठी त्याला मारहाण झाली’, असं नीरव मोदीच्या वकीलाने न्यायालयात सांगतिलं.
मला भारताला सोपवलं तर मी आत्महत्या करेल : नीरव मोदी
नीरव मोदी याला भारताकडे सोपवण्यात यावे अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे. यावर मला भारताला सोपवलं तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी नीरव मोदीने दिली. त्याला भारताकडून निष्पक्ष सुनावणीची अपेक्षा नाही, असंही तो म्हणाला.
19 मार्चला नीरव मोदीला अटक
नीरव मोदीला गेल्या 19 मार्चला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला दक्षिण-पश्चिम लंडनच्या वेंड्सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. भारत सरकारच्या विनंतीवर स्कॉटलँड यार्डने (लंडन पोलीस) प्रत्यार्पण वॉरंट बजावत त्याला अटक केलं होतं.
नीरव मोदीकडून पीएनबीची 13,500 कोटींची फसवणूक
नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चौकसीने काही बँक कर्मचाऱ्यांसोबत मिळून पीएनबी बँकेला तब्बल 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पीएनबीने केला होता. त्यानंतर प्रवर्तन निदेशालय आणि सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. नीरव मोदीवर पळपुटा आर्थिक गुन्हेगार कायदा (एफईओ)अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.