बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या : प्रविण तोगडीया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडीया (Hindu Parishad chief Pravin Togadia) यांनी केली आहे.
नागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (5 फेब्रुवारी) लोकसभेत केली. या घोषनेनंतर हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडीया यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी प्रविण तोगडीया (Hindu Parishad chief Pravin Togadia) यांनी केली.
“अयोध्येतील राममंदिर आंदोलनात विहिंपचे दिवंगत नेते अशोक सिंघल, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, महंत रामचंद्र परमहंस, महंत अवैद्यनाथ यांचं मोठं योगदान आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या चारही जणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”, असे तोगडीया (Hindu Parishad chief Pravin Togadia) म्हणाले.
“उद्धव ठाकरेंना माझं समर्थन”
“उद्धव ठाकरे कुणासोबत सत्तेत आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. पण ते हिंदूंसाठी काय करतात? हे महत्त्वाचं आहे. उद्धव यांनी हिंदूत्त्वचं काम करत रहावं. माझं त्यांना समर्थन आहे”, असं मत प्रविण तोगडीया यांनी व्यक्त केलं. याशिवाय “जेव्हा भाजपचं कुणी तोंड पहायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेनेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची साथ दिली. आता अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितलं तेव्हा भाजपने ते द्यायला हवं होतं”, असा घणाघातही प्रविण तोगडीया यांनी केला.
“मोदी सरकार बांगलादेशींना संरक्षण देत आहे”
प्रविण तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्यावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा नाही, असं केंद्रीयमंत्र्यांनी सांगीतलं आहे. याचा अर्थ तीन कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढण्याची केंद्र सरकारची काही योजना नाही. देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा लागू करण्याचं सोडून मोदी सरकार बांगलादेशींना संरक्षण देत आहे”, असा आरोप तोगडीया यांनी केला.
“भाजपला हिंदू मतदान करत नाही. त्यामुळे हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला. शाहीनबागमधील आंदोलकांच्या जेवणाचा खर्च कोण करतंय? सरकारने शोधून सांगावं”, असे आवाहन प्रविण तोगडीया यांनी केंद्र सरकारला दिलं.
“केंद्र सरकारच्या अपयशामुळे देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या”
दरम्यान, हिंगणघाट जळीतकांडावरुन प्रविण तोगडिया यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “हिंगणघाट येथील प्रकरणाचा 100 दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल लावावा. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत 100 टक्के दोषारोप सिद्ध व्हावेत. दुसऱ्यांच्या आई बहिणींचा सन्मान करा, तेव्हाच आपली आई-बहीण सुरक्षित राहील, अशा प्रकारचे मोहिम देशभरात चालवणं गरजेचं आहे”, असे प्रविण तोगडिया म्हणाले.