VIDEO : मी पुरातली बाई बोलतेय…
महापूर (Kolhapur sangli floods) आलेल्या ठिकाणी किंवा महापुरात अडकलेल्या महिलांची अवस्था काय होत असेल याची कल्पना करणं भयंकर आहे. पण पुन्हा महाप्रलयाच्या या चिखलातून तीच उभारी घेते आणि पुन्हा घरंही उभं करते.
मुंबई : महिलांच्या अनेक दु:खांना नाव गावं नसतं. त्यामुळे त्या दु:खांसाठी इतरांची सहानुभूती मिळणं तर दूरचं, उलट शरमेपोटी ती तिच्या अनेक अडचणी इतरांना सांगूही शकत नाही. त्यात महापूर (Kolhapur sangli floods) आलेल्या ठिकाणी किंवा महापुरात अडकलेल्या महिलांची अवस्था काय होत असेल याची कल्पना करणं भयंकर आहे. पण पुन्हा महाप्रलयाच्या या चिखलातून तीच उभारी घेते आणि पुन्हा घरंही उभं करते. अशा एका पुरातल्या बाईच्या मनातल्या भावनांचा कल्लोळ कसा असू शकतो हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न…
मी पुरातली बाई बोलतेय.. पुरानं विस्थापित झालेली.. तसा बाईचा जन्म काय कमी विस्थापितांसारखा नाही म्हणा.. त्यामुळे विस्थापनानं उद्ध्वस्त होणं काय असतं?, हे मी सोडून दुसरं कोण चांगलं सांगेल?… गव्हाच्या डब्यात कीड पडली अख्खं धान्य उन्हात वाळवणारी मी, आणि आज माझ्याच डोळ्यादेखत पाण्यातच धान्याला कोंब फुटलेत.. घरात एक माशीही भूणभूण करताना दिसली, तरीतरी घरातलं मी संपूर्ण घर पोतारुन काढायची.. इथं पावसानं माझ्या अख्ख्या घरावरुनच पोतारा फिरवला…
उद्या अन्न-धान्यांची पाकिटं येतील, दोन-चार भांडीही मिळतील.. पण, हक्कांच्या भांड्यांवर ज्या तळमळीनं कासाराकडून नावं कोरली होती…. घरात पहिलं मिक्सर, पहिलं फ्रिज आल्यावर ज्या आनंदानं मी उसळली होती.. तो आनंदही या पुरानं हिरावून नेला, ज्याची भरपाई जगातलं कुठलंच सरकार नाही देऊ शकत…
अशा नैसर्गिक आपत्तींवेळी माझे हाल, माझ्या समस्याही माझ्यासारख्या दुर्लक्षितच होतात.. अनेक दुःखांना तर नावंही नाही.. जे मला खुलेपणानं सांगताही येत नाही.. सॅनिटरी पॅड नाही मिळालेत म्हणून काय झालं? मी अनेकदा गोणतं नाहीतर फडक्यानंही भागवते….
डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत चिंब भिजल्यावर मला अंगही चोरावं लागतं.. डोळ्यात अश्रू आणि गळ्यात हुंदका दाटलेला असताना आडोश्याला जाऊन बाळाला दूधही पाजावं लागतं..
मृत्यूनं कवटाळलं तरी लेकराला सोडलं नाही, पुराच्या महातांडवातही मातृत्वाला हरु दिलं नाही.. मदतीसाठी आलेल्या हातांचे मोठ्या मनानं आभार मानले.. त्याच हातांना मी राख्याही बांधल्या..
”हे ही दिवस सरतील” या उक्तीनं घरात खेळलेलं पाणीही सरेल., सरकारी दिमतीवर घराचे खांबही उभे राहतील.. पण, ”माझं उभं राहणं” कोणत्याही सरकारच्या मदतीची वाट नाही पाहत.. माझ्या कोसळण्याला पैशांचा टेकू आधार देऊ शकत नाही .. माझा आधार हा मीच असते..
म्हणतात की ”माझ्याविना” जगाचा ऱ्हाटगाडा चालवणाऱ्या विठ्ठलाचंही पान हलत नाही.. मला फक्त एकदा या कृष्णा आणि पंचगंगेनं सवड द्यावी, पुन्हा तिच्याच काठावर माझी ”पंढरी” नाही वसवून दाखवली, तर नावाला ”बाई” लावणार नाही..