पाकिस्तानवर हल्ला ही मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल : मुशर्रफ
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला अमानवी असल्याचं म्हटलंय. मुशर्रफ यांनी हल्ल्याचा निषेध तर केला, पण यासोबतच भारताला धमकीही दिली. पाकिस्तानवर हल्ला केला तर ती मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. पाकिस्तानला धमक्या देणं बंद करा, तुम्ही आम्हाला धडा शिकवू शकत नाही, असंही […]
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला अमानवी असल्याचं म्हटलंय. मुशर्रफ यांनी हल्ल्याचा निषेध तर केला, पण यासोबतच भारताला धमकीही दिली. पाकिस्तानवर हल्ला केला तर ती मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. पाकिस्तानला धमक्या देणं बंद करा, तुम्ही आम्हाला धडा शिकवू शकत नाही, असंही मुशर्रफ बरळले.
इंडिया टुडेशी बोलताना मुशर्रफ यांनी पाकिस्तान सरकारचं समर्थन केलं. पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मदची भूमिका असू शकते, पण यामध्ये इम्रान खान सरकारची कोणतीही भूमिका नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे पाकिस्तानला दोष देणं बंद करा. जैशविषयी माझ्या मनात सहानुभूती नाही. पाकिस्तानमध्ये या संघटनेवर बंदी घातली गेली पाहिजे. जैश ए मोहम्मदने माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असं मुशर्रफ म्हणाले.
“भारतीय चॅनल आम्हाला शिव्या घालतायत”
पुलवामा हल्ल्यानंतर भारतात जी स्थिती आहे, ती रोष वाढवणारी आहे. भारतातल्या टीव्ही चॅनलमध्ये पाकिस्तानला ज्या पद्धतीने शिव्या घातल्या जात आहेत, ते योग्य नाही. भारतीय चॅनलवर सर्वच जण सध्या पाकिस्तानला शिव्या घालत आहेत. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच पाकिस्तानला जबाबदार धरलंय. टीव्ही चॅनलच्या चर्चांमध्ये अपशब्द वापरले जात आहेत, असा कांगावा करत पाकिस्तान निर्दोष असल्याचा आव मुशर्रफ यांनी आणला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरही मुशर्रफ यांनी भाष्य केलं. मोदींनी बदला घेण्याची भाषा केली आहे. पण ती मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. मोदींपेक्षा जास्त राग माझ्या मनात आहे. भारतात जेव्हा काश्मिरी मारले जातात असं मी म्हणतो तेव्हा माझ्याही मनात तेवढाच रोष असतो. काश्मिरी मुलांच्या डोळ्यात गोळ्या लागतात तेव्हा माझ्याही डोळ्यात अश्रू येतात, असं मुशर्रफ म्हणाले.
“भारतीय हे काश्मिरींचे शत्रू”
काश्मीरमध्ये जे लढत आहेत, ते मुदाहिद्दीन आहेत, दहशतवादी नाही. माझ्या मते ते काश्मीरमध्ये जे करत आहेत, ते काश्मीरच्या शत्रूंसोबत करत आहेत आणि ते शत्रू तुम्ही आणि तुमची सेना आहे. ते मुजाहिद्दीन आहेत. तिथे निःशस्त्र मुलं-महिला आणि दगडफेक करणाऱ्यांवर शस्त्रांचा वापर केला जातोय, असा आरोप मुशर्रफ यांनी केला.
पुलवामा हल्ल्यात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत माझी सहानुभूती आहे. मी 1971 च्या युद्धात माझा सर्वात जवळचा मित्र गमावलाय. आपला व्यक्ती गमावणं काय असतं याचं दुःख मला माहित आहे, असं म्हणत मुशर्रफ यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. पण यासाठी पाकिस्तान जबाबदार नसल्याचा कांगावाही केला.
व्हिडीओ पाहा :