भारत पुन्हा हल्ला करु शकतो..पाकच्या या अधिकाऱ्याने व्यक्त केली भीती, तरी म्हणाला आता आम्ही ७० विमाने…
पाकिस्तान "ऑपरेशन सिंदूर" नंतर अजूनही भारताला घाबरुन आहे. तेथील अधिकारी आता भारत पुन्हा आपल्यावर हल्ला करु शकतो असे म्हणत आहेत. एका माजी राष्ट्रीय सल्लागाराने तर भारताचा पुन्हा एकदा मिसाईल हल्ला करण्याचा हेतू असल्याचे म्हटले आहे.

Pakistan News : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाला मोठा धडा शिकवला आहे. भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानची चांगलीच तंतरली. आणि भारताने नऊ लष्करी आणि अतिरेकी प्रशिक्षण स्थळे नष्ट केली आणि पाकिस्तानची अनेक विमाने पाडली. एवढच नाही तर पाकिस्तानचे एअरबेस देखील भारतीय सैनिकांनी चक्काचूर करुन टाकले. त्यानंतर पाकिस्तानने पांढरे निशान फडकवत सीजफायरची भिक मागितल्याने युद्धविराम झाला. युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानची दर्पोक्ती सुरुच आहे.भारत काहीही करु शकतो याची पाकला भीतीही वाटत आहे. आता पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासिर जंजुआ यांनी भारत पाकिस्तानवर आणखी एक मिसाईल हल्ला करु शकतो असे म्हटले आहे. काय म्हणाले जंजुआ ते पाहूयात…
पाकिस्तानची दर्पोक्ती
पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासिर जंजुआ यांनी म्हटले आहे की भारतावर करडी नजर ठेवावी लागणार आहे. तो पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करु शकतो. तरीही त्यांनी दर्पोक्ती करत म्हटले की भारताला नीट माहिती आहे की पाकिस्तानकडे अत्याधुनिक मिसाईल तंत्रज्ञान आहे आणि तो भारताच्या नापाक इराद्यांना चांगले उत्तर देऊ शकतो. ते पुढे म्हणाले की हक्काच्या लढाईनंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्यांचा आत्मसन्मान जगात वाढला आहे आणि भारत एकटा पडला आहे.
70 विमानांसंदर्भात वल्गना
भारतातील अंतर्गत राजकीय भानगडी अशा आहेत की तो पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करु शकतो याकडे डोळेझाक करुन चालणार नाही असे पाकचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासिर जंजुआ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानची स्तूती करत म्हटले की भारताने हल्ला केला तर पाकिस्तान त्यांची 70 विमानांना पाडून टाकेन. तर पाकच्या परराष्ट्र व्यवहार प्रकरणाचे तज्ज्ञ मुहम्मद मेहदी यांनी म्हटले आहे की चीन आणि अमेरिकेशी पाकिस्थानचे असलेले समांतर संबंध एक धोरणात्मक यश आहे. परंतू या संबंधात आणखी पुढे जायला हवे आहे.
गंभीर धोका कायम
जिओ न्यूजच्या मते नौदलाचे रिअर एडमिरल ( सेवानिवृ्त्त ) एन.ए. रिझवी यांनी दावा केला की जो पर्यंत पाकिस्तान त्याचे ग्वादर बंदर सुरु करत नाही तोपर्यंत आपल्यासाठी गंभीर धोके कायम रहातील. परंतू पाकिस्तानच्या समुद्री सुरक्षेबाबत कोणी गैरसमजात राहू नये असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
