
भारतात आजही मोठ्या प्रमाणात लोक ट्रेनने प्रवास करतात. खरंतर रेल्वेही कोट्यवधी लोकांची लाईफलाईन आहे. आपण रोज या रेल्वेतून प्रवास करतो. रेल्वे रुळ बघतो. पण रेल्वे रुळांमध्ये फट का असते? याचा कधी विचार केला का? असं का करत असतील? त्याशिवा प्लॅटफॉर्म रिकामे दिसत असले तरी ट्रेन स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबते. असे का होते? असे नानाविध प्रश्न काहींच्या मनात पडलेले असतात. पण त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. ही कारणं प्रत्येकाला माहीत हवीतच.
तुम्ही कधी ट्रेनने प्रवास करताना, रेल्वे फाटक ओलांडताना किंवा स्टेशनवर उभे असताना रुळांकडे लक्षपूर्वक पाहिले आहे का? आणि जर पाहिले असेल, तर तुम्ही पाहिले असेल की काही अंतरावर रुळांना जोडून ट्रॅक तयार केला जातो. कारण खूप लांब पटरी एकाच तुकड्यात तयार करणे शक्य नसते, त्यामुळे अनेक भागांना जोडून ट्रॅक बनवला जातो.
रेल्वे रूळांमध्ये फट का ठेवतात?
जर तुम्हाला वाटत असेल की रेल्वेच्या पटऱ्यांमधील ठेवलेली फट ही फक्त रिकामी जागा भरण्यासाठी असते, तर तसे अजिबात नाही. ही जागा मुद्दाम आणि विचारपूर्वक ठेवली जाते. यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा विचार केलेला असतो. लोखंडाच्या पटऱ्या थंडीत लहान होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेमुळे प्रसरण पावतात (फुगतात). जर या प्रसरणासाठी मध्ये जागा ठेवली नाही, तर पटऱ्यांवर ताण येऊन त्या वाकू शकतात किंवा तडे जाऊ शकतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच पटऱ्यांमध्ये ठेवलेली ही छोटीशी फट अतिशय महत्त्वाची असते. तापमानातील बदलांचा परिणाम लक्षात घेऊन ही रचना केली जाते, जेणेकरून रेल्वेची हालचाल सुरक्षित आणि सुरळीत राहील.
रेल्वे रूळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा
1. रुळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा म्हणजे उष्णतेमुळे होणारा प्रसरण सांभाळणे
2. लोखंडी रुळ उन्हात तापले की त्यांची लांबी वाढते आणि थंडीत कमी होते. जर रुळांमध्ये फट ठेवली नाही, तर उष्णतेमुळे ते एकमेकांवर दाब देऊन वाकू शकतात किंवा उंचावू शकतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो
3. म्हणूनच ही छोटी फट रुळांना सुरक्षितपणे प्रसरण-आकुंचन होऊ देते आणि रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित ठेवते
ट्रेन स्टेशनवर येण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबण्याची मुख्य कारणे
1. प्लॅटफॉर्म मोकळा नसणे – त्या प्लॅटफॉर्मवर आधीची ट्रेन उभी असू शकते
2. रूट सेट न झालेला असणे – स्टेशनमधील पॉइंट्स (रुळ बदलण्याची व्यवस्था) अजून सेट केलेले नसतात
3. सुरक्षित अंतर राखणे – दोन ट्रेनमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते.
4.सिग्नल प्रणालीची प्रक्रिया – स्टेशन मास्टर किंवा कंट्रोल रूमकडून क्लिअरन्स मिळेपर्यंत ट्रेन पुढे जाऊ शकत नाही
5. क्रॉसिंग किंवा ओव्हरटेक – कधी दुसऱ्या महत्त्वाच्या किंवा जलद गाडीला आधी मार्ग दिला जातो