बँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच
बँकांच्या आडमुठे धोरणामुळे मृत शेतकऱ्यांचे वारसदार अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत (Farmer loan waiver).
वर्धा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी (Farmer loan waiver) योजनेच्या पाच याद्या जाहीर झाल्या. या पाच याद्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील तब्बल 377 मृत शेतकऱ्यांचा समावेश आहे. या मृत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, बँकांच्या आडमुठे धोरणामुळे या शेतकऱ्यांचे वारसदार अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत.
वर्ध्यातील 377 मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना कर्जमाफीचा (Farmer loan waiver) लाभ मिळाला नसल्याचं समोर आल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हा उपनिबंधक यांनी बँकांना तातडीने वारसांची माहिती दुरुस्त करत अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मृत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती बँकांनी नव्याने अपलोड करावी आणि त्यांना लाभ देण्यात यावे, अशी नोटीस बँकांना बजावण्यात आली आहे. यावर कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्वच बँकांना देण्यात आल्या आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेत आतापर्यंत पाच याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पाच यादी मिळून जिल्ह्यात 53 हजार 329 शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. यापैकी जिल्ह्यातील 50 हजार 272 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. त्यांच्या खात्यात 446 कोटी 8 लाख रुपये जमा झाले आहेत.
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या वारसांची बँकनिहाय यादी
स्टेट बँक ऑफ इंडिया – 178 सेट्रल बँक -08 विदर्भ कोकण बँक -10 बँक ऑफ बडोदा – 11 महाराष्ट्र बँक – 51 बँक ऑफ इंडिया – 84 अलाहाबाद बँक – 08 युनियन बँक – 21