सहा वर्षीय मुलाच्या जबाबामुळे नगरमधील ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळं वळण
अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या नगर जिल्ह्यातील ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील निघोज गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. पतीनेच पत्नीला मारल्याचं बोललं जातंय. मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा जबाब घरातील सदस्य असलेल्या चिमुकल्या सहा वर्षीय साक्षीदाराने दिलाय. रुख्मिणीच्या सहा वर्षीय भावाच्या जबाबामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची […]
अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या नगर जिल्ह्यातील ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील निघोज गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. पतीनेच पत्नीला मारल्याचं बोललं जातंय. मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा जबाब घरातील सदस्य असलेल्या चिमुकल्या सहा वर्षीय साक्षीदाराने दिलाय. रुख्मिणीच्या सहा वर्षीय भावाच्या जबाबामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
जबाबानुसार, मंगेश हा पत्नी रुख्मिणीला मारहाण करत होता, असं तिच्या आईने सांगितलंय. त्यामुळे रुक्मिणी ही आपल्या आई-वडिलांच्या घरी आली होती. मंगेश घरी येऊन रुख्मिणीला मारेल या भीतीने तिच्या आईने तिला आणि तिच्या बहीण-भावाला घरात कोंडून ठेवलं होतं. त्याच वेळी मंगेश घराच्या मागील भागातून घरात आला आणि त्यानेच पत्नी रुख्मिणीला पेट्रोल टाकून पेटून दिल्याचं छोट्या भावाने सांगितलंय.
याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी मुलीच्या घरातील सदस्यांसह 15 व्यक्तींचे जबाब नोंदविले आहेत. आणखी सखोल तपास करण्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहेत. पोलीस सर्वच बाजूने तपास करत असल्याचं पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलंय. ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, त्या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळताना दिसतंय.
काय आहे प्रकरण?
पारनेर तालुक्यातील या घटनेत भाजलेल्या पीडितेचा मृत्यू झाला. पीडित मुलीचे नाव रुख्मिणी रणसिंग, तर मुलाचे नाव मंगेश रणसिंग आहे. या दोघांनी सहा महिन्यांपूर्वीच आंतरजातीय विवाह केला होता. या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. अखेर विरोध डावलून लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलीचे मामा आणि वडिलांनी मुलीसह जावयाला ढवळे वस्ती येथे घरात कोंडलं. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं, असा आरोप आहे. यात दोघेही मोठ्या प्रमाणात भाजले. मुलीचा उपचारदरम्यानच मृत्यू झाला. मुलाची प्रकृतीही गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. मुलीचे वडील फरार असून मामाला अटक केली आहे. हे सर्व उत्तरप्रदेशचे रहिवासी असून कामानिमित्त अहमदनगरला आले आहेत. मामा सुरेंद्रकुमार बाबूलाल भरतीया आणि घनश्याम मोहन सरोज अटक यांना अटक करण्यात आली आहे.
VIDEO :