Balasaheb Thorat | गोविंदा पथक हा संस्कृतीचा भाग, नोकरीत आरक्षणाचा फेरविचार करावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बाळासाहेब थोरातांचा सल्ला
बाळासाहेब थोरात म्हणाले, ' उध्दव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गट करत असलेली टीका आता सत्तेमुळे होत असावी.. पण आपल्यासाठी कुणी काही केलं तर त्याची जाणीव ठेवायची असते...
मुंबईः गोविंदा पथक आणि गोविंदा हे आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. त्यामुळे त्यात निश्चितच कौशल्य आहे, ही बाब मानतो. पण नोकरीत आरक्षण हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दहीहंडींमध्ये (Dahihandi) सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला. याविरोधात विद्यार्थी संघटना तसेच विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र टीका होतेय. गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्यास वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचे स्वप्न भंग होईल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर फेरविचार करणार का, हे पहावे लागेल.
जाणीव ठेवावी…
दीपक केसरकरांसह एकनाथ शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरे गटावर तसेच मूळ शिवसेनेवर टीका करत आहेत. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ उध्दव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गट करत असलेली टीका आता सत्तेमुळे होत असावी.. पण आपल्यासाठी कुणी काही केलं तर त्याची जाणीव ठेवायची असते…
‘सवंग लोकप्रियतेसाठी डॉल्बीवर बोलू नये’
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी सणासुदीच्या काळात डॉल्बी वाजवण्यास परवानगी द्यावी, असे म्हटले. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ कधीही भावनिक होऊन निर्णय घेऊ नये त्याची वेगळी प्रतिक्रिया येते त्यामुळे भावनिक होऊन निर्णय घेणं योग्य नाही. सवंग लोकप्रियतेकरता डॉल्बीसारख्या गोष्टीचा निर्णय घेऊ नये…
‘इंग्रजांप्रमाणे यांनाही जावं लागेल’
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत उत्तम काम केल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यांच्या कोरोना काळातील कामगिरीची इतिहासात नोंद होईल, असंही ते बोलले. तसेच केंद्र सरकारवर टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ इंग्रजांनी मिठावर कर बसवला ह्यांनी पीठावर बसवला इंग्रजाणा जावं लागलं ह्यांना ही जावं लागेल…?’
‘सुरक्षा यंत्रणा काळजी घेतील’
रायगड येथील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास एक संशयित बोट आढळून आली. या बोटीचा पुढील तपास एटीएस मार्फत होतोय. त्यानंतर आज मुंबईतील ट्रॅफिक कंट्रोल रुमला आलेल्या धमकीच्या पार्श्वभमीवर गृह विभागाकडून काळजी घेतली जात आहे. मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय.