कर्नाटकात प्रसादात विष कालवल्याचा संशय, 11 जणांचा मृत्यू
बंगळुरु: कर्नाटकच्या चामराजनगर येथे प्रसाद खाल्ल्याने 11 जणांना मृत्यू झाला आहे. तर 80 जणांची प्रकृती बिघडली आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी चामराजनगर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या प्रसादात विष कालवण्यात आल्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवडी गावात शुक्रवारी एका धार्मिक […]
बंगळुरु: कर्नाटकच्या चामराजनगर येथे प्रसाद खाल्ल्याने 11 जणांना मृत्यू झाला आहे. तर 80 जणांची प्रकृती बिघडली आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी चामराजनगर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या प्रसादात विष कालवण्यात आल्याची शक्यता आहे.
कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवडी गावात शुक्रवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद खाल्ल्यानंतर अनेक भाविकांना उलट्या होऊ लागल्या, तर काहींच्या पोटातही दुखू लागले. त्यानंतर त्यांना उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी 11 जणांना मृत घोषित केले. चमरानगरचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीणा यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्य सरकार आणि पोलीस आयुक्तांनी मंड्या आणि म्हैसूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चमरानगर आरोग्य विभागाला हवी ती मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यासोबतच कर्नाटक सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली, तसेच इतर सर्व पीडितांच्या उपचाराचा खर्चही सरकार उचलणार आहे.
प्रसादातून विषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रसादात विष कालवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.