आपसात वादातून जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, सात जणांचा मृत्यू
इंडो-तिबेटियन सीमा पोलिसातील (आयटीबीपी) जवानांमध्ये आपापसात वादातून झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला
रायपूर : इंडो-तिबेटियन सीमा पोलिसातील (आयटीबीपी) जवानांमध्ये आपापसात झालेल्या वादाने सात जणांचा जीव घेतला. जवानाने सहकाऱ्यांवर केलेल्या गोळीबारात सात जवानांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. छत्तीसगडमधील (Chhatisgarh ITBP Jawan Firing) नारायणपूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूरमध्ये आयटीबीपीच्या 45 व्या बटालियनच्या कॅडेनर कॅम्पमध्ये हा प्रकार घडला.
प्राथमिक माहितीनुसार इंडो-तिबेटियन सीमा पोलिस विभागातील जवानांमध्ये आपसात काही वाद झाले. याच रागातून एका जवानाने आपल्या बंदुकीतून (सर्व्हिस वेपन) सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, एका जवानाने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी प्राण सोडले, तर एका जवानाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचा एकूण आकडा सातवर पोहचला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जवानांमधील वादाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुट्टी न मिळाल्यामुळे आरोपी जवान नाराज होता. यावरुनच त्यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे
मसुदुल रहमान – प. बंगाल महेंद्र सिंह – हिमाचल प्रदेश सुरजीत सरकार – प. बंगाल दलजीत सिंह – पंजाब विश्वनाथ महतो – प. बंगाल बीजीश – केरळ
जखमी जवान उल्लास – केरळ सीताराम दून – राजस्थान
Chhatisgarh ITBP Jawan Firing