इथं पक्षाचा विषय नाही, मराठा समाजाचा प्रश्न आहे, संभाजीराजे आक्रमक
खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या युवकांसाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत (Chhatrapati Sambhajiraje on Sarthi issue).
कोल्हापूर : खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत (Chhatrapati Sambhajiraje on Sarthi issue). सारथी सारख्या संस्थेला स्वायत्त ठेवलं नाही, तर संस्था बुडेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी इथं पक्षाचा विषय नाही, तर मराठा समाजाचा प्रश्न आहे, असं म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या प्रश्नावर पक्षाच्या पलिकडे जाऊन काम करणार असल्याचं सूचित केलं आहे. संभाजीराजे यांनी सारथी प्रकरणी तात्काळ बैठक घेण्याचीही मागणी केली आहे.
खासदार संभाजीराजे म्हणाले, “मराठा समाजातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील वर्षी सारथी या संस्थेची स्थापन करण्यात आली. मात्र, प्रधान सचिवांनीच यात घोळ घातला. यामुळे तयार झालेल्या प्रश्नांमुळे आंदोलनही करण्यात आले. यानंतर सरकारने आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मात्र, पाठपुराव्यानंतरही 10 महिन्यात सरकारने या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय केलं? सरकार यावर काहीच उत्तर देऊ शकणार नाही.”
“सारथी संस्था स्वायत्त ठेवली नाही तर संस्था बुडेल. त्यामुळे तात्काळ संबधित मंत्र्यांनी बैठक घ्यावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा. या आधी 10 महिने उलटूनही मदत का झाली नाही? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं पक्षाचा विषय नाही, तर मराठा समाजाचा प्रश्न आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
‘विनाकारण द्वेष निर्माण होतोय, तो टाळा’
संभाजीराजे म्हणाले, “माझा प्रामाणिक हेतू आहे. माझ्या दृष्टीने निधीला महत्त्व नाही, तर आधी धोरण ठरवायला हवं. रोजगार देणं सारथीचं काम नाही. रोजगारासाठी अगोदर काय लागतं ते शिकवण्यासाठी सारथी काम करत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यात हस्तक्षेप करावा. सकल मराठा समाजाची मिटिंग बोलवावी आणि बाजू समजून घेत काही अडचणी असतील तर त्या सांगाव्यात. विनाकारण द्वेष निर्माण होतोय, तो टाळावा.”
‘सारथी’चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी
दरम्यान, सारथीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले आहे. सारथी संस्थेबाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी, अशी मराठा समाजाची भावना आहे, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला (Sambhajiraje Chhatrapati on Sarthi Institute issue).
सारथी संस्थेच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घालून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर वडेट्टीवार काल (2 जुलै) पुण्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी “सारथी संस्था बंद पडणार नाही”, असं सांगितलं.
“काही लोक याप्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे कोण आहे? ते मी नंतर बोलेल”, असं वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवारांच्या या प्रतिक्रियेनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले. त्यांनी फेसबुकवर राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. याशिवाय सारथी संस्था बंद करण्यासाठी बरेच प्रयत्ने केले गेल्याचा आरोप केला.
“सारथीचा पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, सारथीबाबत समाजाला जे पाहिजे तेच होईल. राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणं, हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे सारथीच्या स्वायत्ततेसाठी आणि भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र यावं”, असं आवाहन छत्रपती संभाजीराजेंनी केलं.
हेही वाचा :
‘सारथी’चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी
आयुक्त-महापौर वाद शमेना, तुकाराम मुंढेंनी कंत्राटदाराला 18 कोटी कसे दिले? नागपूरच्या महापौरांचा सवाल
Chhatrapati Sambhajiraje on Sarthi issue