सुरेश जैन यांच्यावर चक्की पिसण्याची वेळ अखेर आलीच : एकनाथ खडसे
सुरेश जैन आणि सहकारी हे एक दिवस जेलमध्ये जातील आणि चक्की पिसतील, असं आपण यापूर्वीच सांगितलं होतं. आज त्यांनी चक्की पिसण्याचा तो दिवस आलेला आहे, हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
जळगाव : सुरेश जैन (Suresh Jain) आणि सहकारी एक दिवस जेलमध्ये जातील, याची खात्री होती. आज चक्की पिसण्याचा दिवस आलेला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे. जळगाव घरकुल घोटाळ्याचं (Jalgaon Gharkul Scam) प्रकरण खडसेंनी उचलून धरलं होतं. त्यामुळे दोषींना शिक्षा झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळ्याच्या विशेष न्यायालयात माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह 48 आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘सुरेश जैन यांचा घरकुल घोटाळा हा अनेक वर्षांपासून सुरु होता. हा घोटाळा दडपण्यासाठी सुरेश जैन यांनी अनेकदा पक्षबदल केले. सत्ताधारी पक्षांमध्ये गेले. काँग्रेसमधून शिवसेनेत, तिथून राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत आले. मंत्री झाल्यावर त्यांनी हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला, मात्र आज आपल्या प्रयत्नाला यश आलं आहे’ असं एकनाथ खडसे म्हणाले.
‘सुरेश जैन सध्या शिवसेनेत आहेत, मात्र त्यांची बांधिलकी नेमकी कोणाशी आहे, हेच समजत नाही. ते निवडणुकीत प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र शिक्षा झाल्यामुळे ही शक्यता संपुष्टात आली आहे’ असंही खडसे म्हणाले.
सुरेश जैन आणि सहकारी हे एक दिवस जेलमध्ये जातील आणि चक्की पिसतील, असं आपण यापूर्वीच सांगितलं होतं. आज त्यांनी चक्की पिसण्याचा तो दिवस आलेला आहे, हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, असंही खडसे म्हणाले.
पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांना 183 कोटी रुपयांचा जबर दंड ठोठावण्यात आलेला आहे. धाक वाटावा असा हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा विषय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उचलून धरल्यानंतर या प्रकरणातील संशयितांचं अटकसत्र सुरु झालं होतं.
सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड तर गुलाबराव देवकर यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर राजेंद्र मयुर, जगन्नाथ वाणी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर घोटाळ्याचा निकाल हाती आला आहे.
काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?
जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचं ठरवलं. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचं कर्ज काढून 11 हजार घरकुलं बांधण्याच्या कामाला 1999 मध्ये सुरुवात झाली.
या योजनेतील सावळागोंधळ 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचं उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आलं. पालिकेने घरकुलं ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिलं. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदाराला विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.
याच काळात पालिकेचं महापालिकेत रुपांतर झालं. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. ही बाब महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या लक्षात आल्यावर तीन फेब्रुवारी 2006 रोजी शहर पोलिस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली.
या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री सुरेश जैन यांच्यासह खानदेश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयुर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा सुमारे 90 जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन आणि संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनही मार्च-एप्रिल 2008 पर्यंत घरकुल गैरव्यवहारातील संशयितांना अटक झाली नव्हती. संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलिस अधिकाऱ्यांची चालढकल, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे सहा वर्ष हा तपास रेंगाळला.