काळा- गोरा भेदभाव नाही, ‘रंग माझा वेगळा’ पाहून यवतमाळच्या तरुणीचा विवाह
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला (Rang Maza Vegla) प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. नुकताच या मालिकेने 100 भागांचा यशस्वी टप्पा पार केला.
मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला (Rang Maza Vegla) प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. नुकताच या मालिकेने 100 भागांचा यशस्वी टप्पा पार केला. वर्णभेदावर भाष्य करणारी ही मालिका पाहून यवतमाळ येथील राणी भुते ही युवती प्रेरीत झाली आणि तिने मुलाचा वर्ण न पाहाता विवाह करण्याचा निर्णय घेतला. (Rang Maza Vegla)
व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनिअर असणारी 27 वर्षांची राणी रंग माझा वेगळा मालिकेची चाहती आहे. वर्णभेदावर भाष्य करणारा मालिकेचा विषय आणि दिला जाणारा संदेश राणीला मनापासून पटल्यामुळेच, तिने अनुराग मिसाळ यांच्याशी लग्न करण्याचं ठरवलं आणि तिला या निर्णयात कुटुंबाचीही साथ मिळाली.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत कार्तिक ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या आशुतोष गोखलेशी राणी यांनी संपर्क साधला. मालिकेला नुकतेच 100 भाग पूर्ण झाले या निमित्ताने या जोडप्याला सेटवर बोलवण्यात आलं होतं. रंग माझा वेगळाच्या संपूर्ण टीमने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या अनोख्या अनुभवाविषयी सांगताना आशुतोष गोखले म्हणाला, जो विषय पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे. मालिकेमुळे मतपरिवर्तन होत असेल तर ही खूप महत्त्वाची बाब आहे. या प्रसंगामुळे आम्ही सर्वच खूप भारावून गेलोय.