धबधब्यावर गेलेल्या कल्याणमधील तरुणीचा मृत्यू
या ठिकाणी आलेल्या तरुणीचा पाय घसरुन पडल्यामुळे मृत्यू झाला. संजना शर्मा असं या तरुणीचं नाव असून ती कल्याण येथे राहणारी असल्याची माहिती आहे. मित्र-मैत्रिणींसोबत ती फिरण्यासाठी आली होती.
रायगड : तुम्ही वर्षा पर्यटनासाठी जात असाल तर स्वतःची काळजी घ्या. कारण, धबधब्यावर गेलेल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यातील नेरळ परिसरातील टपालवाडी धबधबा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आलेल्या तरुणीचा पाय घसरुन पडल्यामुळे मृत्यू झाला. संजना शर्मा असं या तरुणीचं नाव असून ती कल्याण येथे राहणारी असल्याची माहिती आहे. मित्र-मैत्रिणींसोबत ती फिरण्यासाठी आली होती.
पावसाळा सुरु होताच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाईची पाऊलं नेरळ परिसरातील धबधब्याकडे वळतात. मात्र अतिसाहसामुळे अनेक दुर्घटना घडतात आणि काहींना आपले प्राण गमवावे लागतात. या ठिकाणी आज सकाळी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सजंना शर्मा या तरुणीचा मृत्यू झाला.
संपूर्ण कोकण आणि रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी पर्यटकांची पावसाळ्यात मोठी गर्दी होते. कर्जत तालुक्यात अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. धबधब्याचं पाणी आनंद देत असलं तरी ते जीवघेणंही कसं ठरतं याची उदाहरणं दरवर्षी समोर येतात. यावर्षीच्या पावसाळ्यात संजना शर्मा या तरुणीचा पहिला बळी गेलाय. त्यामुळे पर्यटकांनी अगोदर जीवाची काळजी करुनच वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा, असं आवाहन केलं जातंय.