कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा, महाराष्ट्राच्या विनंतीप्रमाणे अलमट्टी धरणातून विसर्ग नाहीच
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्यास सांगली जिल्ह्यातील महापुराचं पाणी ओसरण्यास मदत होईल, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, मात्र कर्नाटक सरकारने अपेक्षेपेक्षा कमी पाणी सोडलं
बंगळुरु : अलमट्टी धरणातून (Almatti Dam) पाणी सोडण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (B S Yediyurappa) यांना केलेली विनंती धुडकावण्यात आली आहे. सांगलीतील पुराचं पाणी ओसरावं, यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याची विनंती केली होती, मात्र त्यानुसार अपेक्षित विसर्ग केला जात नसल्याचं समोर आलं आहे. यातून पुन्हा एकदा ‘कानडी सरकारचा आडमुठेपणा’ अधोरेखित होत आहे.
पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला विनंती केली होती. मात्र अलमट्टी धरणातून त्यापेक्षा कमी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. पावसासोबतच धरणाच्या पाण्यामुळे सांगलीत आलेल्या महापुराने (Sangli Flood) स्थानिक नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडवली आहे.
अलमट्टी धरणातून सकाळी दहा वाजताच्या सुमारास 4 लाख 30 हजार 352 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत होता. आता तो साडेचार लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
Discharge from Almatti dam was 4,30,352 cusecs in the morning at 10 am. (50,000 cusecs more than the inflows) Now it is increased to 4,50,000 cusecs. https://t.co/KN2hQvRXNJ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 9, 2019
कर्नाटकात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. या धरणातून पाणी पुढे न सोडल्यामुळे कृष्णेने महाराष्ट्रातील सांगलीत थैमान घातलं आहे. विसर्ग वाढवल्यास कृष्णा नदीचं महाराष्ट्रातील पाणी कमी होऊन जिल्ह्यातील पूर ओसरण्यास मदत होणार आहे.
सांगलीतील ब्रम्हनाळ (Brahmanal) गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना काल (गुरुवार 8 ऑगस्ट) बोट उलटून (Boat Overturn) दुर्घटना घडली होती. नऊ जणांचे मृतदेह काल सापडले होते, तर आज आणखी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.
सांगलीत हाहाःकार
सांगली शहरातील 65 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. अनेक भागात महापुराचं पाणी शिरुन मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचं म्हटलं जात आहे.
बचावकार्य वेगाने
बचाव कार्यासाठी कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर सांगलीत दाखल झालं आहे. महापुरात अडकलेल्या नागरिकांना फ़ूड पॅकेट्स पोहचवण्याचे काम केलं जात आहे. NDRF चे जवान 50 बोटींच्या सहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या प्रयत्नात आहेत.
आतापर्यंत एक लाख 19 हजार 176 पूरग्रस्त आणि 25 हजार 260 जनावरांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये चार बोटी आणि 24 जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी दोन बोटी आणि 28 जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर आणि करमाळ्यावरुन प्रत्येकी पाच बोटी मागवण्यात आल्या आहेत.