जात, धर्म, प्रांत भेद विसरुन नवीन महाराष्ट्र घडवूया, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा
शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनींच्या जीवनात आनंद निर्माण करेल, असा विश्वास अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलेलं नवीन वर्ष हे ‘ट्वेंटी ट्वेंटी’ वर्ष आहे. क्रिकेटमध्ये ‘ट्वेंटी ट्वेंटी’चा सामना हा अतिशय जोरकस होत असतो. तशाच प्रकारे बेरोजगारी, शेतकरी आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याकरिता प्रयत्न करु. हे वर्ष राज्यातील जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी, घेऊन येईल. शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनींच्या जीवनात आनंद निर्माण करेल, असा विश्वास अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.
नववर्षाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्यातील समस्त जनतेला समृद्ध, प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुट होण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक प्रगत, पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राचीही प्रतिष्ठा कायम राखताना आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवरही राज्याची घोडदौड कायम राहावी, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करुया. जात, धर्म, प्रांत असे सगळे भेद विसरुन नवीन महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन अजित पवार यांनी नवर्षाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.
ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
बहुप्रतिक्षित असा ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर 30 डिसेंबरला पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
Maharshtra deputy chief minister Ajit Pawar