सतत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्या उडवल्या, अनेक सैनिकही मारले
प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत नौसेरा सेक्टरजवळ पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत, ज्यात अनेक पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानकडून सकाळी 6.30 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन (Pakistan Ceasefire violation) करण्यात आलं होतं.
श्रीनगर : जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यापासून खवळलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदत करणं वाढवलं आहे. नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन (Pakistan Ceasefire violation) केलं जातंय. याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत नौसेरा सेक्टरजवळ पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत, ज्यात अनेक पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानकडून सकाळी 6.30 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन (Pakistan Ceasefire violation) करण्यात आलं होतं. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात संदीप थापा या भारतीय जवानालाही वीरमरण आलं.
भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याचं संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्णल देवेंद्र आनंद यांनी सांगितलं. नौसेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केल्यानंतर भारतीय सैन्याने त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. पाकिस्तानच्या गोळीबारात देहरादून येथील 35 वर्षीय संदीप थापा यांना वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात पत्नी निशा थापा आहेत, अशीही माहिती देण्यात आली.
जागतिक स्तरावर भारताविरुद्ध कोणतंही यश येत नसल्यामुळे पाकिस्तान अजूनच खवळला आहे. स्वतःच्या कारखान्यात तयार झालेले दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसवण्याचा शक्य तो प्रयत्न पाकिस्तानी सैन्याकडून केला जातोय. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना बळ देत आहे. केरन सेक्टरमध्येही दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला होता. यावेळी पाकिस्तानच्या चार जवानांना कंठस्नान घालण्यात आलं. आपल्या चार सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पाकिस्तानकडूनही दुजोरा देण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान खाली, तरीही खोटेपणा सुरुच
काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची (UNSC) बैठक (UNSC Meeting on Kashmir) पार पडली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत (UNSC Meeting on Kashmir) चीनने पाकिस्तानची बाजू घेतली, तर रशियाने द्वीपक्षीय चर्चेचं समर्थन केलं. भारताने जम्मू काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाने सद्यपरिस्थिती बदलली आहे, ज्यामुळे काश्मीरमध्ये नाजूक परिस्थिती असून यूएनएससी सदस्य मानवाधिकारांबाबत चिंतेत आहेत, असं चीनच्या प्रतिनिधीने बैठकीनंतर (UNSC Meeting on Kashmir) सांगितलं. या बैठकीत पाकिस्तानच्या एकाही मागणीची दखल घेण्यात आली नाही. तरीही संयुक्त राष्ट्राने आपल्या मागण्या गांभीर्याने घेतल्या असल्याचं पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने जनतेला सांगितलंय.