रेल्वेची रखडपट्टी, मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा
गणेशोत्सवासाठी कोकणात (Ganpati Konkan) निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. कोकण रेल्वेने (Konkan Railway) गणपती स्पेशल (Ganpati Special) गाड्या सोडल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.
रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात (Ganpati Konkan) निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. कोकण रेल्वेने (Konkan Railway) गणपती स्पेशल (Ganpati Special) गाड्या सोडल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यातच मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) एसटी बसला आग लागल्याने काही काळ वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) एका एसटी बसला भीषण आग लागली आहे. ही बस मुंबईतील परळ येथून चिपळूण, दहिवली या मार्गे कोकणात जात होती. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माणगावजवळ अचानक या बसने पेट घेतला. या बसमध्ये 52 प्रवाशी होते. मात्र आग लागल्यानंतर या सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून सध्या ही वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
तर दुसरीकडे ऐन गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता दरवर्षी कोकण रेल्वे जादा गाड्या सोडे. मात्र या जादा गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या कोकणकन्या, तुतारी, पनवेल सावंतवाडी, यासारख्या अनेक एक्सप्रेस गाड्यात तब्बल दोन ते तीन तास उशिराने धावत आहे.
कोकणात जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस अडीच तास, तुतारी एक्सप्रेस 1 तास 23 मिनिटे, पनवेल सावंतवाडी साडेतीन तास, पनवेल थिविम गणपती स्पेशल दोन तास रखडली आहे. तर दुरंतो एक्सप्रेस 2 तास , कुर्ला सावंतवाडी गणपती स्पेशल दोन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत.