फडणवीसांच्या ‘त्या’ चौकशीवर कोणताही आक्षेप नाही, प्रसाद लाडांचं शिवसेनेला प्रत्युत्तर
कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हस्तांतरित केल्यानंतर शिवसेनेने आज 'सामना' मुखपत्रातून केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या टीकेवर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रत्नागिरी : “कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कुठल्याही पद्धतीची चौकशी करा. पण पारदर्शक करा, आमचा कोणताही आक्षेप नाही”, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिलं आहे (Prasad Lad answer to shiv sena on Saamna Editorial). कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हस्तांतरित केल्यानंतर शिवसेनेने आज ‘सामना’ मुखपत्रातून केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या टीकेवर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Prasad Lad answer to shiv sena on Saamna Editorial).
“देवेंद्र फडणवीस यांची चौकशी पारदर्शकपणे करा. चौकशी करत असताना कोणताही राजकीय द्वेष ठेवून राजकारण करु नका. तुम्हाला अशा सूड भावनेने राजकारण करायचे असेल तर निश्चित करा पण महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येऊ शकतं, हे देखील विसरता कामा नये”, असा इशारा प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला. त्याचबरोबर कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास यूती सरकारच्या काळात सुरु होता त्यावेळी शिवसेना गप्प का होती? असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला.
“कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस करत होती तेव्हा शिवसेना मित्रपक्षात होती. त्यावेळीच याबाबत शिवसेनेने कॅबिनेटमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांना का विचारले नाही? ‘सामना’ अग्रलेखाचा सल्ला शिवसेनेचा नसून फक्त संपादकांचा आहे. एका संपादकाने काळोखात काय काम केलं याची प्रचिती त्यांनी एक मुलाखतीत दिली आहे. काळोखात काम कोण करतं आणि जनतेला कोण फसवतं हे त्यांनी त्यांच्या तोंडून कबूल केलं आहे. त्यामुळे भाजपला सल्ला देण्याची गरज नाही”, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला.
“एनआयएला राज्य सरकार कोणत्याही प्रकारे थांबवू शकत नाही. संविधानाला धरुनच चौकशी सुरु आहे. त्यामुळे आक्षेप म्हणून तुम्ही बोलू शकता. पण विरोध करु शकत नाहीत”, असे प्रसाद लाड म्हणाले.