प्रशांत किशोर यांच्याकडून शिवसेना उमेदवारांचा लेखाजोखा उद्धव ठाकरेंना सादर
मुंबई : निवडणूक सर्व्हेक्षक चाणक्य प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा लेखाजोखा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला आहे. या रिपोर्टमध्ये शिवसेनेच्या 23 उमेदवारांचा जय-पराजयाचा अहवाल सादर केला आहे. यात शिवसेनेचा कोणता उमेदवार किती मतांनी विजयी होईल आणि कोणत्या प्रकारच्या अडचणीमुळे उमेदवार निवडून येण्यास असफल ठरलाय हे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. याचवेळी भाजप-शिवसेनेच्या […]
मुंबई : निवडणूक सर्व्हेक्षक चाणक्य प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा लेखाजोखा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला आहे. या रिपोर्टमध्ये शिवसेनेच्या 23 उमेदवारांचा जय-पराजयाचा अहवाल सादर केला आहे. यात शिवसेनेचा कोणता उमेदवार किती मतांनी विजयी होईल आणि कोणत्या प्रकारच्या अडचणीमुळे उमेदवार निवडून येण्यास असफल ठरलाय हे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.
याचवेळी भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात किती योगदान दिलं, या कार्यकर्त्यांचं मनोमिलन नक्की दिसलं का हे उद्धव ठाकरे यांना लेखी स्वरूपात निवडणूक सर्व्हेक्षक चाणक्य प्रशांत किशोर यांनी दिलं आहे. प्रशांत किशोर यांच्या कार्यपद्धतीचा शिवसेनेला नक्कीच फायदा होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलंय.
शिवसेनेने ‘चाणक्य’ निवडला, प्रशांत किशोरांकडे रणनीती सोपवली!
दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या सर्वेक्षण अहवाला अगोदरच शिवसेनेच्या विविध संघटनानी अशा प्रकारचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार प्रशांत किशोर शिवसेनेसाठी काम करण्याअगोदरच निश्चित केले होते. शिवसेनेच्या जय-पराजयाची कारणमीमांसा प्रशांत किशोर कसं करतील असा प्रश्न बेळगाव तरुण भारताचे मुंबई आवृत्ती संपादक नरेंद्र कोठेकर यांनी केला आहे.
शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विजयाचा दावा
शिरूरमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पहिल्यांदाच अमोल कोल्हे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान मिळाले. त्यामुळे कोणीही जिंकून येऊ शकेल असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. पण आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी मात्र 90 हजार ते एक लाख मतांनी निवडून येऊ असा दावा केलाय. प्रशांत किशोर यांच्या टीमने तब्बल एक लाख लोकांचा सर्व्हे केलाय आणि त्यातून हा निष्कर्ष आल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला.
प्रशांत किशोर कोण आहेत?
42 वर्षीय प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवासी आहेत.
प्रशांत किशोर हे संयुक्त राष्ट्राच्या ‘हेल्थ मिशन’चे दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम पाहत होते.
नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून आले होते.
त्यांनी भारतातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स अर्थात CAG कंपनीची स्थापना केली.
या कंपनीच्या माध्यमातून प्रशांत यांनी दिग्गजांच्या प्रचाराची कंत्राटं घेतली आणि त्यांना निवडून आणलं.
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींच्या सोशल मीडियाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे होती.
‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रशांत किशोर यांच्या टीमचीच घोषणा होती
2015 मध्ये प्रशांत किशोर यांनी मोदींची साथ सोडली.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपऐवजी त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या प्रचाराची धुरा सांभाळली
बिहारमध्ये जेडीयूला भरघोस यश मिळून, नितीश कुमार सत्तेत आले.
प्रशांत किशोर हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत.
निवडणूक न लढवूनही त्यांना बिहारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.
बिहार निवडणुकीत जेडीयूची रणनीती प्रशांत किशोर यांनीच आखली होती. त्यामुळे जेडीयूला मोठं यश मिळालं.
त्यापूर्वी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या बलाढ्य विजयाची रणनीती प्रशांत किशोर यांनीच ठरवली होती.
‘चाय पे चर्चा’, 3D सभा, ऑनलाईन दरबार, वॉर रुम, सोशल मीडिया, व्हिक्टरी रुम, घर घर दस्तक, रिंगटोन आणि रेकॉर्डेड मेसेज, अशा नवनव्या प्रचार कल्पना प्रशांत किशोर यांनी राबवल्या होत्या.
गुजरातमध्ये 3D प्रचार लोकसभेपूर्वी मोदींच्या 3D सभेचं आयोजन गुजरात निवडणुकीत करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रशांत यांनीच ही योजना आखली होती. त्याचवेळी मोदींची प्रतिमा बदलून हायटेक आणि टेक्नोसेव्ही मुख्यमंत्री अशी झाली होती.