पुणतांब्यात दडपशाही, अन्नत्याग करणाऱ्या मुलींना जबरदस्तीने रुग्णालयात हलवलं
अहमदनगर: ‘देता की जाता’ असा इशारा देत पुणतांबा इथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकींना, पाचव्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास जबरदस्तीने रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलीस आणि महसूल प्रशासनाने दडपशाही केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास पोलीस आणि महसूल प्रशासनाने आंदोलक निकिता जाधव आणि पूनम जाधव यांना उपचारासाठी जबरदस्तीने नगर येथील जिल्हा ग्रामिण […]
अहमदनगर: ‘देता की जाता’ असा इशारा देत पुणतांबा इथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकींना, पाचव्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास जबरदस्तीने रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलीस आणि महसूल प्रशासनाने दडपशाही केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास पोलीस आणि महसूल प्रशासनाने आंदोलक निकिता जाधव आणि पूनम जाधव यांना उपचारासाठी जबरदस्तीने नगर येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालयात हलवलं. मुलींचा विरोध असतानाही महिला पोलिसांनी उचलून रुग्णवाहिकेत टाकले. उपोषणस्थळाचा मंडपदेखील उखडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे उपोषणाचा लवलेशही दिसत नाही. निकिता जाधव हिचे वडील धनंजय जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा गावात निकिता जाधव, पूनम जाधव आणि शुभांगी जाधव या तीन मुलींनी 4 फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पिकाला हमीभाव द्या, दुधाला लिटरमागे पन्नास रुपये भाव द्या आदी मागण्या करत हे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले. आंदोलनच्या चौथ्या दिवशी शुभांगी जाधव हिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर सहाव्या दिवशी पहाटे अन्य दोन मुलींना जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आलं.
दरम्यान काल 8 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता किसान क्रांती कोअर कमिटीची आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. राज्यातील महिलांनी आता हे शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन हाती घेण्याचे आवाहन करण्याचा निर्णय झाला होता. पण रात्री दीडच्या सुमारास गाव झोपेत असताना, सरकारने मोठा पोलीस बळाचा वापर करून, आंदोलन मोडून काढण्याच्या प्रयत्न केला, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
पालकमंत्री राम शिंदे आंदोलकांच्या भेटीला अन्नत्याग आंदोलनाच्या कालच्या पाचव्या दिवशी सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलक मुलींची भेट घेतली. त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र केवळ आश्वासन नको ठोस कारवाई करा म्हणत मुलींनी अन्नत्याग सुरुच ठेवण्याचा निर्धार केला.
दरम्यान शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मुलींची भेट घेत आंदोलनकर्त्या मुलींशी उद्धव ठाकरे यांचे फोनवर बोलणे करून दिले. त्यांनीही मुलींना स्वतः काळजी घ्या सांगत तुमच्या मागण्या संदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान शुक्रवारी सकाळी पुणतांबा परिसरातील शेकडो नागरिकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डी श्रीरामपूर रस्त्यावर रास्ता रोको केला. काल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मुलींशी चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र मुलींनी आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा निर्धार केला.
चौथ्या दिवशी एक मुलगी रुग्णालयात त्याआधी आंदोलनाच्या चौथ्या शुभांगी जाधव या मुलीला रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. शुभांगी जाधव हिची प्रकृति खालावल्याने तिला उपचारासाठी नगर इथे हलवण्यात आलं. रात्री एकच्या सुमारास शुभांगीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं.
जिल्हाधिकारी, तहसिलदारांची चर्चा पुणतांबा येथील 3 युवती अन्नत्याग आंदोलन करत आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तिघींची प्रकृति बिघडली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला वैद्यकीय तपासणी पथकाने दिला त्याचवेळी दिला. तिघींचं वजनही घटलं आहे, तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचं तपासणी पथकाचे डॉ. सुधीर कुदळे यांनी सांगितलं. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हेही आंदोलक मुलींच्या भेटीसाठी आंदोलन स्थळी पोहचले. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी, तहसिलदार अप्पर पोलिस अधिक्षक रोहीदास पवार यांनी आंदोलक मुलींशी चर्चा केली. निकीता जाधव, पूनम जाधव आणि शुभांगी जाधव या तिघींशी जवळपास अर्धा तास चर्चा केली.