राजेशाही असती तर कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेतला असता : उदयनराजे
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दुष्काळावर बोलताना जनतेलाचा दुष्काळावर निर्णय घेण्यास सांगितले आहे. पंढरपुरात विठ्ठलाला दुष्काळ निवारणाचे साकडे घालण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
सोलापूर : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दुष्काळावर बोलताना जनतेलाचा दुष्काळावर निर्णय घेण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, “लोकशाही आहे, तुम्ही राजे आहात. त्यामुळे दुष्काळावर तुम्हीच निर्णय घ्या. राजेशाही असली असती, तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन रिकामा झालो असतो.” पंढरपुरात विठ्ठलाला दुष्काळ निवारणाचे साकडे घालण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्यनराजे भोसले म्हणाले, “देशात लोकशाही असून येथील नागरिक लोकशाहीचे राजे आहेत. त्यामुळे त्यांनीच कष्टकरी, शेतकऱ्यांना त्रासातून मुक्त करावे. राजेशाही असली असती, तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन रिकामा झालो असतो.”
पत्रकारांनी उदयनराजेंना पाण्यावरुन होत असलेल्या राजकारणावर विचारणा केली असता ते म्हणाले, “कोणताही प्रकल्प होताना ज्या-त्या तालुक्याला पाणी आरक्षित ठेवले जाते. हे आरक्षित पाणी ज्या-त्या तालुक्याला मिळावे हीच लोकांची मागणी होती. मी कुठलेही राजकारण करण्यासाठी बसलेलो नाही. मला जनतेची सेवा करायची आहे.”
भोसले यांचे पंढरपूरमध्ये आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी विठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले देखील उपस्थित होते.