स्मृती इराणी 14 किमी अनवाणी पायांनी सिद्धिविनायकाच्या चरणी, राहुल गांधींना हरवून नवस फेडला?
मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना पराभूत केलं. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं. या यशानंतर स्मृती इराणी तब्बल 14 किलोमीटर अनवाणी पायांनी प्रवास करुन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचल्या. याबाबत स्मृती इराणी यांची मैत्रिण आणि टीव्ही प्रोड्युसर एकता कपूरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. […]
मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना पराभूत केलं. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं. या यशानंतर स्मृती इराणी तब्बल 14 किलोमीटर अनवाणी पायांनी प्रवास करुन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचल्या. याबाबत स्मृती इराणी यांची मैत्रिण आणि टीव्ही प्रोड्युसर एकता कपूरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला.
एकता कपूरने स्मृती इराणींसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. “14 किलोमीटरनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतरचा ग्लो” असं एकताने हा फोटो शेअर करताना लिहिलं. एकताने स्मृती इराणींसोबतचे अनेक इन्स्टाग्राम व्हिडीओ आणि स्टोरी शेअर केल्या. एका व्हिडीओमध्ये एकताने सांगितलं की, स्मृती इराणी यांनी 14 किलोमीटर अनवाणी पायाने चालत जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी एकताने स्मृतींना काही बोलण्यास सांगितले, तेव्हा “देवाने नवस पूर्ण केला”, असं स्मृती इराणी म्हणाल्या.
एकताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी या गाडीच्या समोरच्या सीटवर बसलेल्या आहेत. एकता ही मागच्या सीटवर बसून व्हिडीओ शूट करत आहे. यावेळी, “मी पहिल्यांदाच रवीसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आली आहे. आता तो चार महिन्यांचा झाला आहे. मला असं वाटतं आहे की आम्ही संपूर्ण आयुष्यासाठी एका खास नात्यात बांधले गेलेलो आहे. मी त्याची सर्वात खास मावशी आहे”, असं इराणी म्हणाल्या.
स्मृती इराणी या खास नवस फेडण्यासाठी पायी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचल्या होत्या. पण तो नवस काय होता हे स्मृती इराणींनी स्पष्ट केलं नाही. तरीही निवडणुकांमध्ये विजय मिळवणे यापेक्षा अधिक महत्त्वाचं काय असणार आहे. कदाचित राहुल गांधींना हरवण्यासाठी स्मृती इराणींनी हा नवस ठेवला असावा.
एकता कपूरने 23 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्मृती इराणींना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी एकताने स्मृती इराणींची टीव्ही सिरीअल ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ याचं टायटल साँग “रिश्तों के भी रूप बदलते हैं, नए नए सांचे में ढ़लते हैं, एक पीढ़ी आती है एक पीढ़ी जाती है….बनती कहानी नई” लिहिलं होतं.