या खासदारांनी गेल्या पाच वर्षात संसदेत एकही प्रश्न विचारला नाही!
नवी दिल्ली : सोळाव्या लोकसभेत विविध पक्षाच्या नेत्यांची सक्रियता आणि त्यांनी सभागृहात विचारलेले प्रश्न याबाबत रंजक माहिती समोर आली आहे. संसदीय कामकाजाचं विश्लेषण करणारं वेबपोर्टल पार्लियामेंट्री बिझनेस डॉट कॉमने बुधवारी सोळाव्या लोकसभेच्या कामकाजाचं रिपोर्ट कार्ड जारी केलं. यानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि सपा […]
नवी दिल्ली : सोळाव्या लोकसभेत विविध पक्षाच्या नेत्यांची सक्रियता आणि त्यांनी सभागृहात विचारलेले प्रश्न याबाबत रंजक माहिती समोर आली आहे. संसदीय कामकाजाचं विश्लेषण करणारं वेबपोर्टल पार्लियामेंट्री बिझनेस डॉट कॉमने बुधवारी सोळाव्या लोकसभेच्या कामकाजाचं रिपोर्ट कार्ड जारी केलं. यानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि सपा खासदार मुलायम सिंग यादव यांनी गेल्या पाच वर्षात एकही प्रश्न विचारला नाही.
या रिपोर्ट कार्डनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींसह अनेक खासदार त्यांचा खासदार निधी खर्च करण्यात मागे पडले. राहुल गांधींनी त्यांच्या खासदार निधीतली 60.56 टक्के रक्कम खर्च केली, तर मोदींनी 62.96 टक्के रक्कम खर्च केली.
रिपार्ट कार्डनुसार, गेल्या पाच वर्षात 80 टक्के खासदारांनी संसदेत नियमित हजेरी लावली. रिपोर्टमध्ये पक्षनिहाय विश्लेषण करण्यात आलंय. सत्ताधारी भाजप यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेस 21 व्या क्रमांकावर आहे.
प्रश्न विचारण्यात राष्ट्रवादीचे खासदार अव्वल
सोळाव्या लोकसभेत पाच वर्षांमध्ये एकही प्रश्न न विचारणाऱ्या खासदारांमध्ये ज्येष्ठ नेत्यांसह 31 खासदारांचा समावेश आहे. तर सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे, माढ्याचे खासदार विजय सिंह मोहिते पाटील आणि धनंजय महाडिक सर्वात पुढे आहेत. पीआरएसच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातीलच खासदार आहेत. पहिल्या क्रमांकावर सुप्रिया सुळे (1176 प्रश्न), धनंजय महाडिक (1165 प्रश्न), विजय सिंह मोहिते पाटील (1129 प्रश्न), राजीव सातव (1110 प्रश्न), श्रीरंग बारणे (1106 प्रश्न), शिवाजी अढळराव पाटील (1097 प्रश्न), हीना गावित (1091 प्रश्न), आनंदराव अडसूळ (1051 प्रश्न) यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक लागतो.
रिपोर्ट कार्डनुसार, गेल्या पाच वर्षात 93 टक्के सदस्यांनी 1.42 लाखांपेक्षा जास्त प्रश्न विचारले. यामध्ये 171 खासदारांनी सर्वाधिक प्रश्न शेतकरी आत्महत्येवर विचारले, तर शेतीसंबंधी प्रश्नांचाही यामध्ये समावेश आहे. संसदेच्या कार्यवाहीमध्ये 65 हजार पेक्षा जास्त वेळा अडथळा आला, ज्यामुळे कामकाजाचे 500 पेक्षा जास्त तास वाया गेले.
2016 च्या अधिवेशनात सर्वाधिक कामकाज
रिपोर्ट कार्डनुसार, सोळाव्या लोकसभेत 87 टक्के कामकाज झालं. सर्वाधिक कामकाज 2016 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालं होतं. तर गेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वात कमी काम झालं. रिपोर्टनुसार, लोकसभेतील अडथळ्यांमुळे 191 वेळा कोरम पूर्ण न होण्याची स्थितीही ओढावली.
सोळाव्या लोकसभेत 219 सरकारी विधेयक सादर करण्यात आले. यापैकी 93 टक्के विधयेकांना मंजुरी मिळाली. या काळात 1117 खाजगी विधेयकेही सादर करण्यात आली. पण यापैकी एकही विधेयक मंजूर झालं नाही.
उपस्थितीमध्ये भाजप खासदारांची बाजी
सदस्यांच्या वैयक्तीक उपस्थितीमध्ये भाजपचे भैरो प्रसाद मिश्र आणि बीजू जनता दलचे कुलमणी सामल उपस्थित राहण्यामध्ये शंभर टक्क्यांसह अव्वल आहेत. भाजप खासदार गोपाल शेट्टी यांचीही शंभर टक्के हजेरी आहे. रिपोर्ट कार्डनुसार, खासदार निधी खर्च करण्यात राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तराखंडचे खासदार सर्वात पिछाडीवर आहेत.