आनंदराव अडसुळांकडून कन्यादान, अमरावतीत अनाथ दिव्यांग दाम्पत्याचा विवाह
अमरावती : शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिव्यांग दाम्पत्याचा विवाह लावून देत मुलीचं कन्यादाल केलं. तर अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी मुलाचे वडील म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. वधु-वराला आशीर्वाद देण्यासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीड आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याजवळच्या वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस बालगृहात लहानाच्या मोठ्या […]
अमरावती : शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिव्यांग दाम्पत्याचा विवाह लावून देत मुलीचं कन्यादाल केलं. तर अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी मुलाचे वडील म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. वधु-वराला आशीर्वाद देण्यासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीड आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याजवळच्या वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस बालगृहात लहानाच्या मोठ्या झालेल्या वैशाली आणि अनिल या दिव्यांगांचा शुभविवाह शनिवार 9 फेब्रुवारीला सांयकाळी श्रीहव्याप्र मंडळाच्या भव्य प्रांगणात मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. या सामाजिक लग्न सोहळ्याचा हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी खा. अडसुळ यांच्या घरी झाला. या हळदीच्या कार्यक्रमामध्ये मुला-मुलीला हळद लावण्यात आली.
शनिवारी दुपारी 5 वाजताच्या दरम्यान नवरदेव टाऊन हॉल येथून राशी काढण्यात आला. शंकरबाबा पापळकर, पालकत्व स्वीकारणारे संजय बाविस्कर, अनाथ आणि बालगृहातील सर्व मुले-मुली आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वाजत-गाजत आणि फटक्यांच्या आतषबाजीत नवरदेव राजकमल, गांधी चौक मार्गे लग्नस्थळी पोहोचला. तेथे वधू पक्षाकडून नवरदेवाचे स्वागत करण्यात आले. सांयकाळी सात वाजताच्या सुमारास मंगलाष्टके सुरू झाली. उपस्थित सर्वांनी अक्षदा वधु-वरावर टाकल्या. फटाक्यांच्या आतषबाजी आणि टाळ्यांच्या कडकडाटात लग्न लागले. शंकरबाबा पापळकर यांची वैशाली 20 वी मानसकन्या आहे. वैशाली एक महिन्याची असताना चेंबूर येथे सापडली होती. तसेच अनिल हा 19 वा मानसपुत्र आहे. सहा महिन्याचा असताना भेंडी बाजार मुंबई येथे सापडला होता.
या दोघांचेही पालन पोषण वझ्झर येथील बालगृहात शंकरबाबांनी केले. उपवर झालेल्या या दोघांचाही विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज तो थाटात पार पडला. खासदार आनंदराव अडसुळ आणि मंगला अडसुळ यांनी वैशालीचे कन्यादान केले. मुलाचे मामा विभागीय आयुक्त पियुष सिंह, मुलीची मावशी आमदार अॅड. यशोमती ठाकूर, मुलाचे मोठे भाऊ जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुलीचे मोठे भाऊ शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, मुलीचे काका पुरुषोत्तम हरवाणी आणि मुलीच्या मामा शिवप्रभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भालेराव होते. या सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली. या विवाह सोहळ्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री प्रवीण पोटे, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ. कमलताई गवई, आ. सुनील देशमुख, यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या सहयोगाने या विवाह सोहळ्यात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी शिवप्रभु प्रतिष्ठानच्या वतीने पुणे येथील रसिक प्रस्तुत ‘सोबतीचा करार’ हा मराठी गझल आणि गीतांचा कार्यक्रम झाला. कवी वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे आणि संगीतकार आशिष मुजुमदार यांनी तो सादर केला.