सीएए, एनआरसी विरोधात ‘वंचित’चा एल्गार, शांततेच्या मार्गाने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
"महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु, हा बंद शांततेने करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज (शुक्रवार 24 जानेवारी) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक (Vanchit Bahujan Aghadi Maharashtra Bandh) दिली आहे. या बंदमध्ये सुमारे 35 संघटना सहभागी होतील, असा दावा ‘वंचित’कडून करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आला आहे. सीएए कायदा लागू करण्यामागे सरकारची दडपशाही आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळेच आम्ही ‘महाराष्ट्र बंद’ची पुकारल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
“महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु, हा बंद शांततेने करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याऐवजी लोकांनी हक्काच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या झेंड्याखाली आंदोलन करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
“वंचित बहुजन आघाडी ही भाजपच्या चुकीच्या धोरणांना सातत्याने विरोध करत आहे. आतादेखील आम्ही भूमिका घेतली आहे. आमच्यानंतर इतर लोक भूमिका घेतील, असं प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi Maharashtra Bandh) म्हणाले होते.