Ajit Pawar | दादांना विचारलं कोरोनाची लाट रोखण्यासाठी काय तयारी ? अजित पवार यांनी पाढाच वाचला, म्हणाले…
राज्य सरकारने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी काय तयारी केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी राज्य सरकारने केलेल्या तयारीची पूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेवढ्या ऑक्सिजनची गरज होती, त्याच्या तिप्पट ऑक्सिजनची तजवीज करण्याचे निर्देश दिले आहे, असे पवार यांनी सांगितले आहे.
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे तिसऱ्या लाटेचे ढग गडद होताना दिसत आहेत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन केले जात आहे. असे असले तरी रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी काय तयारी केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी राज्य सरकारने केलेल्या तयारीची पूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेवढ्या ऑक्सिजनची गरज होती, त्याच्या तिप्पट ऑक्सिजनची तजवीज करण्याचे निर्देश दिले आहे, असे पवार यांनी सांगितले आहे. ते पुण्यात बोलत होते.
तिप्पट ऑक्सिजनची व्यवस्था करा
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दुसरी लाट संपली तेव्हापासूनच आम्ही आढावा घेत होतो. सगळ्या जिल्हाधिकारी, आरोग्य विभागांना तिसरी लाट येणार हे गृहित धरून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधे बेड यांची तजवीज करा असं सांगत आहोत. उद्योगांना लागणारा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला. दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजन लागलेला आहे; त्याच्या तिप्पट ऑक्सिजनची व्यवस्था आपापल्या भागात करावी, असं आम्ही सांगितलं होतं. पुणे जिल्ह्यात आपण ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत,” असे अजित पवार म्हणाले.
ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक रुग्णालयांना मंजुरी
तसेच पुढे बोलताना “यंदाच्या अधिवेशनात आरोग्य विभागाला सक्षम करण्यासाठी आपण ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक रुग्णालयांना मंजुरी दिली. त्यांना निधीदेखील चांगला दिला आहे. परवाच चारेचार हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महानगपरपालिका, नगरपालिका यांच्याकडे जी रुग्णालये आहेत, त्यांनासुद्धा आपण कोरोनाविरोधात लढण्यासाठी तजविज करावी असं आम्ही सांगितलं होतं,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
घरोघरी जाऊन लस देण्याचे निर्देश
“पहिला आणि दुसरा डोस सर्वांनी घ्यावा असा आपला आग्रह होता. पहिल्या डोसबाबत नागरिक जागरुक होते. मात्र आता दुसऱ्या डोसबाबत नागरिकांना गांभीर्य येत नाहीये. ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी करुन लसीकरण करायला सांगितले आहे,” असेदेखील अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :