नगरमध्ये 30 एकरातील ऊस जळून खाक
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : पाथर्डीत शॉर्टसर्किटमुळे 30 एकरातील ऊस जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे ही घटना घडली आहे. ही आग विजेची तार तूटून झालेल्या शॉटसर्किटमुळे लागली आहे. 12 शेतकऱ्यांच्या शेतातून विजेची मुख्य लाईन गेली होती. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नेमकी काय घटना घडली? सकाळी दहाच्या सुमारास वीजवाहक […]
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : पाथर्डीत शॉर्टसर्किटमुळे 30 एकरातील ऊस जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे ही घटना घडली आहे. ही आग विजेची तार तूटून झालेल्या शॉटसर्किटमुळे लागली आहे. 12 शेतकऱ्यांच्या शेतातून विजेची मुख्य लाईन गेली होती. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नेमकी काय घटना घडली?
सकाळी दहाच्या सुमारास वीजवाहक तारा अचानक तुटून त्या उसावर पडल्याने उसाने अचानक पेट घेतला. जळालेला सर्व ऊस हा तोडणीसाठी आलेला असल्याने वाळून गेलेला होता. या आगीत एकनाथ बडे, अमीन शेख, बाबुलाल शेख, महंमद शेख, आश्रुबाई पांगरे, बबन पांगरे, भास्कर पांगरे, घनशाम पांगरे, भाऊसाहेब पांगरे, रावसाहेब पांगरे, आश्रू पांगरे, विष्णू पांगरे या शेतकऱ्यांचा तोडणी साठी आलेला ऊस जळून खाक झाला.
आज सकाळी ही आग लागल्याचे लक्षात येताच वडगाव येथील शे-दीडशे तरुण घटनास्थळी जमा झाले. हि आग विझवण्यासाठी पाणीच नसल्याने सरपंच आजिनाथ बडे, शाहदेव पांगरे, दत्तात्रय गरड, युवराज पांगरे, आजिनाथ पांगरे, गणेश बडे आणि इतर तरुणांनी शक्य होईल तेवढा ऊस तोडून बाजूला टाकला.
आग लागल्यानंतर ती विझवायला पाणीच उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली, तर सकाळी दहाच्या सुमारास ही घटना होऊनही सायंकाळी उशिरापर्यंत एकाही शासकीय अधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती.