औरंगाबादेत भरधाव कार विहिरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये मद्यपान करुन पाचही जण निघाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
औरंगाबाद : देशभरात नववर्षाचा जल्लोष होत असतानाच औरंगाबादमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागलं आहे. दौलताबाद किल्ल्यासमोर भरधाव कार विहिरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू (Auranagabad Car Accident) झाला.
अपघातग्रस्त गाडीतील पाचही जण औरंगाबादमधील रोकडा हनुमान कॉलनीतील रहिवाशी असल्याची माहिती आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये मद्यपान करुन पाचही जण निघाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दौलताबाद किल्ल्यासमोरुन जाताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. सौरभ नांदापुरकर आणि विरभास कस्तुरे अशी मयत तरुणांची नावं आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल (Auranagabad Car Accident) करण्यात आलं आहे.