Aurangabad | पेट्रोल दरवाढ अन् प्रदूषणाला पर्याय, ईव्हींचा वापर वाढतोय, जिल्ह्यातील इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींचा आकडा किती?
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 02 हजार 37 इलेक्ट्रिक वाहने धावत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे
औरंगाबादः पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि प्रदूषणाची (Air Pollution) समस्या पाहता सूज्ञ औरंगाबादकरांनी आता ईव्हीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील ईलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) संख्याही वाढताना दिसतेय. जिल्ह्यात सध्या 2 हजार 37 इलेक्ट्रिक वाहने धावत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयाकडून मिळाली आहे. सुरुवातीला इलेकेट्रिक चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे या वाहनांना नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र अलीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरमुळे नागरिकांमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढले आहे. राज्य सरकारतर्फे इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात असून त्याचाही परिणाम वाहनखरेदीवर झाला आहे. शहरातील तीनचाकी आणि चारचाकी ईव्हींसाठी औरंगाबादमधील उद्योजकांनीही पुढाकार घेतला असून याकरिता वेळोवेळी प्रदर्शन आणि प्रोत्साहनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
शहरात सध्या किती ईव्ही?
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 02 हजार 37 इलेक्ट्रिक वाहने धावत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे. त्यापैकी – 107- ई कार 1,773- दुचाकी 22- प्रवासी रिक्षा 133- मालवाहू रिक्षा 02- बसेस
उद्योजक आणि मनपाकडून प्रोत्साहन
औरंगाबादमध्ये मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून मिशन ग्रीन मोबिलिटी अंतर्गत औरंगाबादच्या उद्योजकांनी प्रदूषण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मागील काही महिन्यात 250 चारचाकी इलेक्ट्रिक वाहने बुक करण्यात आली. त्यापैकी 101 इलेक्ट्रिक वाहनांचे नुकतेच वितरण करण्यात आले. तसेच तीन चाकी ई वाहन खरेदीसाठीदेखील या मिशनअंतर्गत प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर दुचाकी आणि ई बस रस्त्यावर आणण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत प्रयत्न केले जात आहेत. तसेच शहरात वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या पाहता महापालिकेतर्फेही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात यापूर्वी महावितरणसह काही खासगी संस्थांनी निवडक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातही चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी महापालिकेतर्फे चाचपणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे येत्या काही वर्षात शहरात किमान 20 चार्जिंग स्टेशन उभारण्याची महापालिकेची योजना आहे. मनपाने नुकत्याच खरेदी केलेल्या वाहनांच्या ताफ्यातदेखील सात ई कारचा समावेश आहे.
व्हेंडर्ससमोर पेच?
दरम्यान, औरंगाबादमध्ये ऑटोमोबाइल उद्योगांना सुटे भाग पुरवणारे हजारो व्हेंडर्स आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे सध्याच्या ऑटोमोबाइल उद्योगावर परिणाम होईल. व्हेंडर्सच्या ऑर्डर कमी होऊन ते अडचणीत येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र भविष्यात ईव्ही वाहनांच्या उत्पादनाचाही व्हेंडर्स उद्योगाला पर्याय मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.
इतर बातम्या-