Eknath Shinde : मला काल दुपारनंतरच फाटाफुटीची कुणकुण लागली होती, उद्धव ठाकरेंना कळवलं होतं; चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा
पक्षप्रमुखांच्या विरोधात कोणीही जाऊ शकत नाही. कोणाची हिंमतही नाही. बाळासाहेब ठाकरेंचे कटवट शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनात काम करत आहेत. सगळे एकत्र बसतील आणि बोलतील, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार कालपासून वेगळ्या हालचालीत होते. याची कुणकुण काल दुपारपासूनच लागली होती, असे वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. मात्र सर्व शिवसैनिक कडवट आहेत. ते शिवसेनेची साथ सोडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर (Vidhan Parishad Election Result) शिवसेनेची मते फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर पक्षांतर्गत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. जवळपास 30 ते 35 आमदारांसह ते सुरतमधील हॉटेलमध्ये आहेत. शिवसेनेच्या या बंडावर खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही शिवसैनिक शिवसेना (Shivsena) सोडणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
‘परत येतील, खात्री आहे’
बंडाच्या पवित्र्यात असलेले सर्व आमदार परत येतील, खात्री आहे. तीन पक्षाचे सरकार आहे. थोडी नाराजी तर असतेच. मागे दोन पक्षाचे सरकार होते, तेव्हाही नाराजी होतीच. भाजपाचा मुख्यमंत्री होता. शिवसेनेचे तर मंत्रीच होते. त्यावेळीही नाराजी होती. काम नाही केले तर नाराजी होते. हे चालतच असते. मात्र आताची नाराजी थेट पक्षप्रमुखांवर असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, की पक्षप्रमुखांच्या विरोधात कोणीही जाऊ शकत नाही. कोणाची हिंमतही नाही. बाळासाहेब ठाकरेंचे कटवट शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनात काम करत आहेत. सगळे एकत्र बसतील आणि बोलतील, असे ते म्हणाले.
‘निकालानंतर थोडी गडबड जाणवली’
उद्धव ठाकरे पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील. उद्धव ठाकरे सर्व संकटे झेलण्यास समर्थ आहेत. जिल्ह्यातले सहा आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत, याची कुणकुण काल दुपारपासूनच लागली होती. त्यावेळेला वाटले होते, काहीतरी गडबड आहे. काळजी घ्यावी लागेल. निकाल लागल्यानंतर काहीतरी फाटाफूट झाल्याते लक्षात आले. हे वर कळवले होते. मात्र तरीसुद्धा सर्वजण एकत्र येतील, अशी खात्री चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.