उन्हाळ्यात घशाला कोरड, पावसाळ्यातही तेच वांधे, औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचं काम कुठवर? कोर्टासमोर वाचलेला अहवाल पहा!
औरंगाबादकरांच्या घशाला कायमच कोरड पडलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांना दिवसाला पाणी मिळण्याची स्वप्न दाखवली जात आहे. पण औरंगाबादच्या अनेक भागात पाणी कधी सहाव्या तर कधी सातव्या दिवशी येते. आता औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेचे काम कुठवर आलं आहे, याची माहिती हायकोर्टासमोर सादर करण्यात आली आहे.
औरंगाबादकर रोज नळाला पाणी येण्याची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. पण त्यांचे स्वप्न सत्यात काही उतरले नाही. समांतर योजना (Samantar Scheme) पूर्ण तर झालीच नाही, पण त्यातील अनियमिततेनेच ती गाजली.आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (Maharashtra Jeevan Pradhikaran) पाणी पुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) कामाला मुहुर्त साधला आहे. प्राधिकरणाने या कामाचा इत्यंभूत आराखडा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर (Bombay High Court of Aurangabad Bench) सादर केला आहे. त्यात सर्वात अगोदर या भल्यामोठ्या योजनेसाठी किती लांब जलवाहिनी (Pipeline) टाकण्यात येणार आहे, त्यासाठी किती पाईप्सची गरज पडणार आहे आणि त्याची निर्मिती कुठे करण्यात येत आहे याची माहिती सादर करण्यात आली. एका जनहित याचिकेमुळे हा सर्व प्रपंच हायकोर्टासमोर आला आहे. अर्थात या योजनेवर एक प्रकारे कायद्याचा वाचक ही आहे. त्यामुळेच याविषयीची आकडेवारी जनतेसमोर आली आहे. कोर्टासमोर प्राधिकरणाने काय सांगितले ते पाहुयात.
काम युद्धपातळीवर सुरु
औरंगाबाद शहराची तहान भागवण्यासाठी पैठण ते औरंगाबाद शहर अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. न्या. सी. व्ही. भडंग आणि न्या. संदीपकुमार मोरे यांच्या खंडपीठासमोर प्राधिकरणाने याची माहिती सादर केली. दोन कंपन्यांकडे सहा हजार 552 मीटर जल वाहिन्यांची (पाईप) नोंदणी करण्यात आली असून या वाहिन्या पुढील 40 दिवसांत मिळतील. प्राधिकरणचे ॲड. विनोद पाटील यांनी खंडपीठापुढे माहिती सादर केली.त्यानुसार प्राधिकरणाने नवी दिल्लीची जिन्दाल सॉ लिमिटेड आणि परळ-मुंबईच्या वेल्स्पून कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांना प्रत्येकी 3 हजार 276 मीटर, अशा एकूण 6 हजार 552 मीटर वाहिन्यांचा पुरवठा करणार आहेत. तसेच हैदराबादच्या जीव्हीपीआर इंजिनिअरिंग लिमिटेड तर्फे जागेवरच पाईपचे उत्पादन सुरू आहे. जलकुंभ, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, आदी कामे सुरू आहेत. 622.5 मीटर पाईपलाईन 16 जूनपर्यंत अंथरण्यात आली आहे. 142 मीटर लांबीच्या 19 पाईपसाठी खोदकाम सुरू आहे, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.
जागेवरच पाईप निर्मितीवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात न्यायालयाचे मित्र सचिन देशमुख यांनीही बाजू मांडली. पाईप निर्मितीच्या कंपन्या असताना जागेवर पाईप निर्मितीचे काय कारणअसा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मनपा कडून संभाजी टोपे, याचिकाकर्ते अमित मुखेडकर व केंद्राकडून अजय तल्हार हे काम पाहात आहेत. जनहित याचिकेवर येत्या 30 जून रोजी सुनावणी होणार आहे.
कारणं नकोत पाणी द्या
मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी पुरवठा वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल, याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या महिन्यांच्या सुरुवातीला दिल्या होत्या. तेव्हापासून यंत्रणा कामाला लागली आहे.