पुतण्यानं काकाला सुनावलं! ‘बगलबच्चांचं ऐकून काका काहीही बोलतात’ संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना टोला
बीड तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकले होते. दहा ग्रामपंचायत पोट-निवडणुकीत 8 जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय.
बीड : मराठवाड्यातील बीड तालुक्यात काका-पुतणे पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादी आदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागरांना उद्देशून टोला हाणला. संदीप यांनी ‘काका बगलबच्चांचं ऐकून बालिश वक्तव्य करतात’ असं म्हटलंय. राज्यात आपण अनेकदा काका-पुतण्याचा संघर्ष पाहिला आहे. अनेक काक-पुतण्याच्या जोड्या राजकारण गाजवतानाही पाहिले आहेत.
पुतण्यानं काकांना सुनावलं
बीड तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकले होते. दहा ग्रामपंचायत पोट-निवडणुकीत 8 जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. हा दावा करतानाच त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना उद्देशून म्हटलंय की, काका मुंबईला राहतात. त्यामुळे स्थानिक परिस्थिती काय आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांचे बगलबच्चे त्यांना फोनवरुन परिस्थिती सांगतात. बगलबच्छाचे ऐकून ते बालिश वक्तव्य करतात, असं असल्याचा आरोप पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केलाय.
शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेचे वर्चस्व असल्याचा दावा केला होता. काकांच्या दाव्यानंतर आमदार संदीप क्षीरसागरांकडून नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला. आता पुतणे संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचंय.