भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, दोन गोडाऊन जळून खाक
भिवंडी तालुक्यात अग्नितांडव सुरुच आहे. तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत प्रेरणा कॉम्प्लेक्सजवळील गायत्री कंपाऊंडच्या केमिकल गोडाऊनला लागलेली आग जेमतेम शमली होती, तेवढ्यात वळ ग्रामपंचायतीमध्येच पुन्हा एक आगीची घटना घडली.
भिवंडी : भिवंडी तालुक्यात अग्नितांडव सुरुच आहे. तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत प्रेरणा कॉम्प्लेक्सजवळील गायत्री कंपाऊंडच्या केमिकल गोडाऊनला लागलेली आग जेमतेम शमली होती, तेवढ्यात वळ ग्रामपंचायतीमध्येच पुन्हा एक आगीची घटना घडली. येथील महावीर कॉम्प्लेक्स या गोडाऊन संकुलात घरगुती वापराचे प्लास्टिक साहित्य साठवलेल्या गोडाऊनला मंगळवारी (24 जुलै) रात्री 9 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन गोडाऊन जळून खाक झाले असून तेथील लाखो रुपयांचं साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे.
सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची घटना कळताच स्थानिकांनी भिवंडी महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. मात्र, महापालिकेच्या सर्व गाड्या वीस तासाहून अधिक काळापासून गायत्री कंपाऊंडच्या गोडाऊनला लागलेली आग विझवण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे महावीर कॉम्प्लेक्सच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण, ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं.
या आगीत दोन गोडाऊन जळून खाक झाले आहेत. त्यामुळे गोडाऊनमध्ये साठवलेल्या प्लास्टिकच्या सामानाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तरी या गोडाऊन पट्ट्यामध्ये सतत लागणाऱ्या आगीच्या घटना चर्चेत आल्या आहेत.
पाहा व्हिडीओ :