शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमानी संघटना आक्रमक, जलसमाधी आंदोलनासाठी तुपकर निघाले…
या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा – शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे मुंबईकडं रवाना झालेत. शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक झाली आहे. जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन रवाना झालेत. अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. सोयाबीनला साडेबारा हजार रुपयांचा दर मिळावा आणि कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा, अशा काही मागण्या रविकांत तुपकर यांच्या आहेत. मुंबईकडं रवाना होत असताना त्यांच्या आंदोलनासंबंधात कोणी काय म्हटलं, याचे अपडेट ते मोबाईलवरून टीव्ही ९ मराठीत पाहत होते.
सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह आज सकाळी मुंबईकडे रवाना झालेत. २४ नोव्हेंबरला अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.
23 नोव्हेंबर रोजी सकाळी कारने ते शेतकऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. या आंदोलनासंदर्भात यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली होती. मात्र, अशा कितीही नोटीस आल्या तरी माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.
आता मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनीही रविकात तुपकर यांना नोटीस पाठविली आहे. अरबी समुद्रात आजपर्यंत असे आंदोलन कोणीच केले नाही. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच जलसमाधी घेणे हा गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे आपण हे आंदोलन करू नये, असे या नोटीसमध्ये लिहिले आहे. त्यामुळं उद्या हे आंदोलन कोणतं वळणं घेत हे पाहावं लागेल. उद्यापर्यंत सरकार काही ठोस निर्णय घेते का, याकडं सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.